प्रशांत जाधव
सातारा – माणचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांना त्यांच्यावर असलेल्या आरोपांची दखल घेत राज्य शासनाने निलंबित केले आहे. या घटनेमुळे जिल्हा महसूल विभागात खळबळ उडाली असताना माण तालुक्यातील एका निलंबित तलाठ्याचा आनंद गगनात मावत नसून या कारवाईमुळे त्या तलाठ्याचा “गुलाब’ सोशल मीडियामध्ये चांगलाच फुलला आहे. माण तालुक्यातील तलाठ्यांच्या व्हॉट्सअप समुहावर “निलंबनाचा बदला निलंबना’ने घेतल्याची पोस्ट टाकल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सबंधित तलाठ्याच्या या कृतीमुळे येवले यांचे निलंबन राजकीय असुयेपोटी केल्याची चर्चा सुरू आहे.
माण तालुक्यातील वाकी येथे गेल्या काही महिन्यांपूर्वी काही तलाठ्यांनी तसेच एका मंडलाधिकाऱ्याने छापा मारून वाळूचे उत्खनन करणारी वाहने पडकली होती. दरम्यान माण तालुक्यातील वाळू तस्करांनी त्याठिकाणी येऊन वाहने सोडण्याबाबत सबंधितांना विनंती केली. मात्र, छापा पथकातील कर्मचारी ऐकण्याच्या मानसिकतेत नसल्याने वैतागलेल्या वाळू तस्कराने मोठमोठ्या अधिकाऱ्यांची नावे घेवून त्यांना पैसे देत असल्याचे सांगितले होते.
अनेक अधिकाऱ्यांची नावे घेताना त्या तस्कराने माणचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्याही नावाचा उल्लेख केला होता. दरम्यान छापा पथकातील एका कर्मचाऱ्याने तहसीलदारांना फोन लावण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यांचा फोन लागला नव्हता. हे सगळे घडत असताना त्याच छापा पथकातील एकाने या सगळ्या घटनेचे चित्रीकरण त्याच्या मोबाइलमध्ये केले होते. त्यानंतर ते चित्रीकरण सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल करून ते महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पाठवण्यात आले होते. त्यामुळे सूर्यकांत येवले काही काळ रजेवर होते.
दरम्यान, माणचे आमदार जयकुमार गोरे यांनी हा मुद्दा विधानसभेत मांडल्याने तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी येवले यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्या चौकशीअंती येवले यांचा या प्रकरणाशी थेट संबंध नसल्याचे समोर आल्याची सुत्रांची माहिती होती. मात्र, राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर अचानक येवले यांचे निलंबन झाल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. अशातच एका गुन्ह्यात फरारी असलेला व येवले यांनीच निलंबित केलेला माण तालुक्यातील तलाठी चांगलाच चर्चेत आला आहे.
तहसीलदारांच्या निलंबनाची नुसती चर्चा सुरु असताना या बहाद्दराने तलाठ्यांच्या व्हॉट्सऍप समुहावर थेट बदला घेतल्याची कमेंट केली आहे. इतकेच नाही तर सध्या टिपणी झाली असून काही वेळातच आदेश मिळेल, अशा आशयाचे लिखाण केले आहे. मंत्रालयात घडत असलेली घडामोड सध्या पोलिसांसाठी फरार असलेल्या तलाठ्याला नेमकी कळाली कशी, तहसीलदारांचे निलंबन करून आपल्या निलंबनाचा बदला घेतल्याचे भाष्य करण्याची धमक एका तलाठ्यात कोणाच्या पाठबळावर आली, असे अनेक सवाल यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत.