नवी दिल्ली – प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने आज सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाच्या माध्यमांमधील वार्तांकनाबाबत तीव्र आक्षेप नोंदवत, स्वतःचा समांतर तपास न चालवण्याचा सल्ला दिला. माध्यमांनी तपास सुरु असलेल्या प्रकरणांचे वार्तांकन पत्रकारितेच्या मूल्यांच्या चौकटीत राहूनच करावे अशी सूचनाही प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने केली.
अशा प्रकिरणातील माध्यमांचे वार्तांकन, दोषारोप ठेवण्यात आलेला व्यक्तीचा गुन्ह्यामध्ये सहभाग आहेच अशी जनभावना निर्माण करणारे नसावे असेही प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या मार्गदर्शिकेत म्हंटल आहे.
“खेद आहे की, अनेक माध्यमांमधील सुशांत सिंह राजपूतच्या कथित आत्महत्येचे वार्तांकन हे पत्रकारितेच्या मूल्यांना तडा जाईल असे आहे. यामुळेच माध्यमांनी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने नमूद केलेल्या पत्रकारितेच्या मूल्यांचे पालन करूनच वार्तांकन करावे.” असं देखील कौन्सिलतर्फे सांगण्यात आलंय.
घडलेल्या गुन्ह्याबाबत नियुक्त यंत्रणेकडून तपास सुरु असतानाच त्याबाबत सुरु असलेल्या अनौपचारिक चर्चांच्या आधारावर वृत्त प्रसिद्ध करणे अपेक्षित नाही. गुन्ह्यासंबंधीचे दररोज वार्तांकन करणे, तथ्यांचा विचार न करता पुराव्यांबाबत टिपणी करणे योग्य नाही.
अशा प्रकारच्या वार्तांकनामुळे गुन्ह्याच्या निपक्षपाती तपासावर दबाव येतो. असंही प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने नमूद केले आहे.
प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने, “माध्यमांना सल्ला देण्यात येतो की, त्यांनी पीडित, साक्षीदार, संशयित आणि आरोपी यांना जास्तीची प्रसिद्धी देऊ नये. असं केल्याने त्यांच्या गोपनीयतेच्या हक्कावर गदा येते. माध्यमांद्वारे साक्षीदारांची ओळख गुपित ठेवणे आवश्यक आहे. असं न केल्यास साक्षीदार आरोपी किंवा आरोपीचे सहकारी वा तपास यंत्रणांच्या दबावाखाली येण्याचा धोका निर्माण होतो.” नमूद केले.