पुणे- राज्यात व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा (सीईटी) तालुकास्तरावर घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तज्ज्ञ समितीचा अहवाल आला की, सीईटी घेण्याबाबत निर्णय जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज दिली. दरम्यान, आतापर्यंत या परीक्षा जिल्हास्तरावर घेतल्या जात आहेत. पण, आता तालुकास्तरावर या परीक्षा झाल्यास विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र बदलणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय पदवी देता येणार नाही, असा निर्णय दिल्यानंतर राज्य सरकारने परीक्षा घेण्याची सुरूवात केली आहे. त्यानुसार राज्यातील विद्यार्थी-पालकांमध्ये सीईटीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. सीईटी कधी होणार याकडे आता लक्ष लागले आहे. राज्यात अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, विधी हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, बीएड अशा अनेक अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा होणे बाकी असून, त्यासाठी सात लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
यासंदर्भात सामंत म्हणाले, करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, जिल्हास्तरावर सीईटी परीक्षा घेण्याबाबत उच्चशिक्षण संचालक डॉ. धनराज माने आणि तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांची समिती पडताळणी करीत आहे. त्यांनी तालुकास्तरावर सीईटी घेण्याबाबत चाचपणी सुरू केली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत, त्याचा अहवाल आल्यावर सीईटीबाबत घोषणा करता येईल, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना अर्ज करताना, शैक्षणिक कागदपत्रे आणि दाखले जमा करण्यात अडचणी येत असतील, तर त्यांना मुदतवाढ मिळेल. शैक्षणिक कागदपत्रे उपलब्ध नसल्याच्या कारणाहून एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नसल्याचे उदय सामंत यांनी म्हटले आहे.