Supriya Sule – “शरद पवारांना पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायचाच नव्हता. मात्र, काही नेते भाजपसोबत चला म्हणून हट्ट धरुन बसले होते. त्यामुळे शरद पवार (shard pawar) नाराज झाले होते. या नेत्यांना कंटाळूनच शरद पवारांनी अखेर पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता,’
असे म्हणत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या टिकेला उत्तर दिले आहे. सुप्रिया सुळेंना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्षपद देऊन भाजपसोबत जायची शरद पवारांची खेळी होती, असा आरोप मंत्री भुजबळांनी केला होता.
सुळे म्हणाल्या, भुजबळांनी शरद पवारांवर जे काही आरोप केले आहेत, त्यात अनेक विसंगती आहेत. एकीकडे शरद पवारांना भाजपसोबत युती करायची होती म्हणायचे आणि दुसरीकडे शरद पवारांनी शब्द फिरवल्याने अजितदादांनी तो पाळला म्हणायचे हे विसंगत आहे.
शरद पवारांना भाजपसोबत जायचे होते तर तुम्ही का शरद पवारांना सोडून भाजपसोबत गेले? राष्ट्रवादीतील अनेक नेतेच भाजपसोबत जाऊया, असा आग्रह शरद पवारांकडे करत होते. मात्र, मी कॉंग्रेसच्या विचारांना सोडू शकत नाही, असे शरद पवारांनी त्यांना स्पष्ट सांगितले होते.
तरीही काही नेते हे ऐकायच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे शरद पवार प्रचंड नाराज झाले होते. अशा नेत्यांना कंटाळूनच शरद पवारांनी अखेर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, असा पुनरोच्चारही सुळे यांनी यावेळी केला आहे.
शरद पवारांचा राजीनामा हे छगन भुजबळांना नाटक वाटत असेल. मात्र आमच्यासाठी ते वास्तव होते. भाजपसोबत जाण्याच्या नेत्यांच्या आग्रहामुळे शरद पवार दुखावले गेले होते. तुम्हाला त्याची जबाबदारी घ्यावीच लागेल.
साहेबांनी राजीनामा दिला तेव्हा नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी त्यांनीच कमिटी बनवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, हेच छगन भुजबळ तेव्हा कमिटी बिमिटी काही नव्हे तुम्हीच आमचे अध्यक्ष रहा, अशी विनंती तेव्हा शरद पवारांना करत होते.
आणि आज तेच भुजबळ साहेबांवर हुकूमशहाचा आरोप करत आहेत. कमिटीचा आग्रह धरणारे शरद पवार हुकूमशहा की कमिटीला नाकारणारे तुम्ही हुकूमशहा? असा सवालही त्यांनी यावेळी विचारला आहे.
भाजपचा दुतोंडीपणा उघड, माफी मागावी
सुळे यावेळी पुढे म्हणाल्या, भुजबळ म्हणतात आमची आताही भाजपसोबत बोलणी सुरू होती. मात्र, हाच भाजप आम्हाला नॅचरल करप्ट पार्टी म्हणून टीका करत होता. स्वत: मोदींनी आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले.
म्हणजे जनतेसमोर आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि मागच्या दाराने आमच्याशी बोलणी करायची, असे भाजपचे चालू होते का? भुजबळांच्या खुलाशामुळे भाजपचा दुतोंडीपणा उघड झाला आहे.
राष्ट्रवादीला भ्रष्टाचारी म्हणणाऱ्या भाजपने राष्ट्रवादीच्या ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांनाच आपल्या सोबत घेतले. खरे तर भाजपने राष्ट्रवादीची माफी मागायला हवी.