कात्रज – मराठा आरक्षणासाठी आत्महत्या होणे ही बाब दुःखद आहे. मागील वेळी देखील मराठा आरक्षणसाठी 58 मोर्चा शांततेच्या मार्गाने काढण्यात आले. यादरम्यान 42 जणांनी आत्महत्या केली. आत्महत्या करणे हा योग्य मार्ग नाही, असे मत मंत्री तानाजी सावंत यांनी व्यक्त केले.
मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या 35 व्यक्तींच्या कुटुंबीयांना मंत्री सावंत यांनी मदतीचा हात दिला. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संभाजीराजे छत्रपती उपस्थित होते. मंत्री सावंत म्हणाले की, घरातील कर्ती व्यक्ती गेल्यानंतर त्या कुटुंबाकडे कोण पाहत नाही. आरक्षण आज किंवा उद्या मिळेल आणि विषय संपेल.
परंतु, टोकाचा निर्णय घेऊ नका, अशी कळकळीची विनंती आहे. हा लढा कशासाठी सुरू आहे ते पहा. शासन आपला निर्णय घेईल. मी कोणती भूमिका आज मांडणार नाही. मराठा समाज माझा असून आत्महत्या, आरक्षण हे अंतिम साध्य नाही. आत्महत्या केलेल्या 35 कुटुंबातील व्यक्तींना आधार देण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला पाच लाख रुपये देण्यात येत आहे.