या देशात मोहन महात्मा नावाचा जिता जागता माणूस होऊन गेला हे मिथक वाटावे, असे सभोवताल गढूळ झाले असताना गांधीजींच्या विचारधारेवर अढळ निष्ठा असणारा आणखी एक ध्रुव तारा कोसळला. आदर्शांची आणि इतिहासाची फेरमांडणी करण्याचे प्रयत्न राजमान्यतेने सुरू असताना सुंदरलाल बहुगुणा यांचे देहावसन होणे, ही या देशाचे वर्तमान आणि भविष्य दोहोंसाठी न भरून काढणारी हानी ठरणार आहे. असहिष्णुतेने भारावलेल्या असमंजस समाजाला जागेवर आणण्यासाठी गांधी विचारांना पर्याय नाही, हे सांगणारे अधिकारी व्यक्तिमत्त्व नसणे हे अधिक दुर्दैवी आहे.
गांधीवाद म्हणजे निसर्गरक्षण, गांधीवाद म्हणजे अंत्योदय, गांधीवाद म्हणजे आत्मसन्मान, गांधीवाद म्हणजे मानवता, गांधीवाद म्हणजे हक्कासाठी जागरूकता, गांधीवाद म्हणजे खोट्याशी संघर्ष… विजयाची सुतराम शक्यता नसताना अहिंसा आणि आत्मक्लेशावर असणारी अढळ निष्ठा. हे सारे गांधीजींनंतर आत्मसात केलेल्या मोजक्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे सुंदरलाल बहुगुणा.
गांधीजी आणि श्रीदेव सुमन यांच्याकडून प्रेरणा घेत अवघ्या 14 वर्षांचा सुंदरलाल स्वातंत्र्य आंदोलनात उतरला. सात महिन्यांचा कारावास भोगला आणि जणू गांधीमय होऊन गेला. 1947 ला देशाला स्वातंत्र्य मिळाले तरी टेहरी या संस्थानाचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण व्हायला आणखी दोन वर्षे लागली. तोपर्यंत सुंदरलाल यांचा संघर्ष सुरूच होता.
स्वातंत्र्यानंतर राजकीय क्षेत्रातला आपला सहभाग संपला, हे मनोमन जाणवलेल्या बहुगुणांनी 1956 मध्ये विवाह करून आपलं जीवन सुरू केले. पण मनात अंत्योदायाचे विचार कायम होते. त्यामुळेच दलितांच्या मंदिर प्रवेशाचे आंदोलन केले. बदकेदार मंदिरात त्यांनी अनेक दलितांसह प्रवेश केला. त्याकाळात ही गोष्ट कल्पनेपलीकडची होती, असे समकालीन विचारवंतानी म्हटले आहे. ब्राह्मण कुटुंबात जन्म घेऊनही हे करायचे धाडस केवळ गांधी विचारावरील अतूट निष्ठेतून आले होते.
या हिमालयाच्या जादुई निसर्गाला 1960च्या दशकात दारूचे ग्रहण लागले, कुटुंबे उद्ध्वस्त होऊ लागली, त्यावेळी हिमालयातील हा गांधीबाबा पुन्हा मैदानात उतरला. त्यांनी दारू विरोधात आंदोलन पुकारले आणि स्वतंत्र भारतात तीन वेळा कारावासही भोगला. पण या “सुंदर’ सत्याग्रहामुळे दारूच्या जोखडातून अनेक तरुण सावरले, हे या गांधी विचारांवरील निष्ठेचे महात्म्य होते.
गढवालच्या पर्वतीय क्षेत्रात विकासाच्या नावाने होणाऱ्या वृक्षतोडीला स्थानिकांनी विरोध सुरू केला. या आंदोलनात पर्यावरणवादी कार्यकर्ते चंडीप्रसाद भाट यांच्यासह सुंदरलाल बहुगुणा हेही उतरले. निर्सगानुरूप जीवन हा गांधीविचार या आंदोलनात उतरण्यामागे बहुगुणा यांचा होता. या आंदोलनासाठी बहुगुणा यांनी हिमालयाच्या पर्वतरांगामध्ये काश्मीर ते कोहीमा अशी पर्वतीय क्षेत्रात पदयात्रा काढली. निर्सगावर आधारित आपली जीवन पद्धती जपली पाहिजे.निसर्ग वाचला तर आपण वाचू. निसर्गातून मिळणारे लाभ हे शाश्वत असतात. यासाठी त्यांनी आग्रह धरला.
1970च्या दशकात टेहरी धरण बांधण्याचे केंद्र सरकारने ठरवले. त्याला स्थानिकांचा विरोध होता. त्याविरोधात स्थानिकांनी आंदोलन सुरू केले. या आंदोलनाचे नेतृत्व स्वातंत्र्य सैनिक व्ही. डी. सकलानी करत होते. ते आजारी पडल्यावर ग्रामस्थांनी या आंदोलनाचे नेतृत्व करावे म्हणून बहुगुणा यांना आग्रह धरला.
बहुगुणा यांनी हा आग्रह मान्य केला. या आंदोलनाचे नेतृत्व स्वीकारले. त्यांनी ही झाडे कापायला विरोध करण्यासाठी आंदोलकांनी झाडाला मिठी मारायला सुरुवात केली. या आंदोलनाची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली. चिपको आंदोलन म्हणून या आंदोलनाला प्रसिद्धी मिळली. त्याकाळात जगभरात पर्यावरणवादी लढ्याचे प्रतीक म्हणून बहुगुणा यांच्याकडे पाहिले जाऊ लागले. यासाठी एकूण तब्बल 76 दिवस बहुगुणा यांनी उपोषणही केले.
या आंदोलनाला मिळालेली प्रसिद्धी एका धरणाला केलेला सातत्यपूर्ण विरोध यासाठी नव्हती, तर या आंदोलनात प्रथमच महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. त्यासाठी बहुगुणा यांनीच प्रेरणा दिली होती. महिलांच्या या सहभागामागे त्यांच्यात आत्मसन्मानाची भावना जागृत करणे आणि समाजमनाला त्यांचे बरोबरीचे असणारे स्थान याची जाणीव करून देणे, हाच त्यामागचा उद्देश होता.
टेहरी धरणाला त्यांनी केवळ विरोध केला असे नव्हे, तर सर्वच मोठ्या धरणाला त्यांचा विरोध होता. त्यामुळे पर्यावरणाची हानी तर होतेच शिवाय जैवसाखळीही धोक्यात येते. मानवाचा शाश्वत विकास हा निसर्गाच्या संगतीनेच होतो, हा त्यांचा अट्टाहास होता. त्यासाठी टेहरी ते गडचिरोलीजवळील एटापल्ली अशी पदयात्रा काढून जनजागरण करण्याचा प्रयत्न केला.
आपला आग्रह आपलीच माणसे त्या मागील वैज्ञानिक तथ्य न तपासता हाणून पाडत असतात.
ज्या आंदोलनासाठी बहुगुणा यांनी उपोषण केले. ते सोडण्यासाठी दोनदा पी. व्ही. नरसिंहराव आणि एच. डी. देवगौडा यांनी धरणाचे काम थांबवण्याचे आश्वासन दिले. उपोषण सोडण्यासाठी वेळ मारून नेली. त्याच धरणाच्या पाणलोटात त्यांचे घरही बुडाले. त्यानंतर ते कोटी येथे आपली कुटी उभारून राहू लागले. आयुष्याच्या अखेरच्या पर्वात ते डेहराडून येथे आपल्या कन्येकडे राहू लागले. तेथेच त्यांनी चीरनिद्रा घेतली. त्यातही काव्यगत न्याय असा टेहरी संस्थान भारतात विलीन करताना ते हिमाचल प्रदेशात विलीन करावे असा अनेक नेत्यांचा आग्रह होता. मात्र तत्कालीन संयुक्त प्रांतात (सध्याचे उत्तराखंड) तो विलीन व्हावा यासाठी बहुगुणा यांनीच आग्रह धरला होता.
एका विचार धारेवर निष्ठा ठेवून जीवन समर्पि करणे आता दुर्मीळ होत आहे. अशा वेळी तुकोबांचे शब्द आठवतात-
ऐसी कळवळ्याची जाती।
करी लोभावीण प्रीती।।
श्रद्धा गोखले