मुंबई – नौदल आणि भारतीय तटरक्षक दलाने आपली सागरी व हवाई वाहतुक साधने तैनात करून गेल्या काही दिवसात मुंबईजवळच्या समुद्रात अडकलेल्या चार बार्जमधल्या 600 हून अधिक व्यक्तींची सुटका केली आहे.
भारतीय नौदलाच्या युद्धनौका आणि विमाने, मुंबईहून 3 मैलांच्या अंतरावर 17 मे 2021 रोजी बुडलेल्या पी – 305 या निवासी बार्जवरील 38 बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी सध्या शोध आणि बचाव कार्य करत आहेत.
आयएनएस कोची, आयएनएस कोलकाता, आयएनएस ब्यास, आयएनएस बेतवा, आयएनएस तेग, पी 8 आय हे सागरी गस्त विमान, चेतक, एएलएच आणि सी किंग हे हेलिकॉप्टर्स शोध आणि बचाव कार्य करत आहेत. मदत व बचाव कार्यात साहाय्य करण्यासाठी आयएनएस तलवार सुद्धा रवाना करण्यात आली आहे. 20 मे 2021 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत बार्ज पी -305 वरील एकूण 186 लोकांना वाचवण्यात आले आणि 37 मृतदेह बाहेर काढण्यात आले.
गुजरात किनाऱ्याजवळ आय.एन.एस. तलवारने सपोर्ट स्टेशन 3 आणि ड्रिल शिप सागर भूषण यांना साहाय्य केले. आता ती ओएनजीसीच्या सहायक जहाजांद्वारे सुखरूपपणे मुंबईला परत आणली जात आहेत. मुंबईहून नौदलाच्या हेलिकॉप्टर्सनी या जहाजांमधील 300 हून अधिक कर्मचाऱ्यांना अन्न व पाणी पुरवले.
भारतीय तटरक्षक दलाची जहाजेही शोध आणि बचाव कार्यात सहभागी आहेत आणि त्यांनी केरळ, गोवा आणि लक्षद्वीप समुद्रातील बद्रीया, जिझस, मिलाड, ख्रिस्त भवन, परियानायकी आणि नोव्हाज आर्क या विविध मासेमारी नौकांवरील चालकदलाला सुखरूप परत आणले आहे. भारतीय तटरक्षक दल आणि भारतीय नौदलाच्या जहाजांनी समन्वयाने न्यू मंगलोर बंदराजवळ सिंगल पॉईंट मूरिंग ऑपरेशनसाठी एमव्ही कोरोमंडल सपोर्टर खद, वरील नऊ सदस्यांना सुखरूप बाहेर काढले.
पुरेशा विजेअभावी मुंबईच्या उत्तर दिशेने भरकटलेल्या एमव्ही गॅल कन्स्ट्रक्टरवरील 137 जणांना, दमण इथून आलेली भारतीय तटरक्षक दलाची दोन हेलिकॉप्टर्स, आयसीजीएस सम्राट आणि मुंबईच्या आयएनएस शिक्रा येथील भारतीय नौदलाचे मदत हेलिकॉप्टर यांनी सुखरुप बाहेर काढले.
तत्पूर्वी, भारतीय हवाई दलाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे सुमारे 400 जवान आणि 60 टन उपकरणे अहमदाबादला नेण्यासाठी आपले सी -130 जे आणि एएन -32 ही विमान तैनात केली होती. भारतीय लष्कराने जामनगरहून दीव येथे अभियंता कृतीदल रवाना केले. तातडीच्या मदतीसाठी आणखी दोन तुकड्या जुनागडकडे रवाना केल्या .