मुंबई – राज्याच्या गृहमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीच निमंत्रण दिले होते. परंतु, काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रात ज्या घटना घडत आहेत. त्या घटना बघता या सरकारने संवादाकरीता जागा ठेवली नसल्याचे दिसते आणि कोणी हिटलर प्रवृत्तीने वागायचे ठरवले असेल, तर मग त्यांच्याशी संवादापेक्षा संघर्ष केलेला बरा, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.
भोंग्याच्या वादासंदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला भाजपाने बहिष्कार टाकल्याचे विरोधीपक्षनेते देवेद्र फडणवीस यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात अशाप्रकारची परिस्थिती आम्ही कधीच बघितली नाही. सरकारमधील लोक पोलीस संरक्षणामध्ये विरोधी पक्ष आपल्या भ्रष्टाचारावर बोलतो म्हणून जीवेमारण्या करता हल्ला करतात. आम्ही पोल-खोल यात्रा काढली. या यात्रेच्या माध्यमातून मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार जनतेपुढे मांडला. लोकशाहीमध्ये यापेक्षा वेगळं काय करायचं असतं? पण ज्यांना लोकशाही मान्य नाही, त्यांनी आमच्या पोल-खोल सभा आणि रथांवर हल्ला केला.
यानंतर त्यांना असं वाटतंय की अशा प्रकारचे हल्ले करून आम्ही भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बोलण बंद करू, हा गैरसमज त्यांनी मनातून काढून टाकावा. भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढाई ही सुरूच राहणार आहे, असा इशारा त्यांनी दिली.
ज्या प्रकारे किरीट सोमय्यांवर हल्ला झाला. पोलिसांच्या समक्ष आणि झेड सुरक्षेला पुर्वकल्पना दिल्यानंतरही एखाद्याला मारले जाते किंवा मोहित कंबोज यांचा मॉबलिंचींगचा प्रयत्न झाला. विशेष म्हणजे हे फक्त मुंबईत नव्हे, महाराष्ट्र आणि देशभरातील भाजपाच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना टार्गेट करून त्यांच्यावर केसेस नोंदवल्या जात आहे. इतक्या खालच्या स्थराला आताही नेतेमंडळी पोहोचली असल्याचा आरोपही यावेळी फडणवीस यांनी केला.