नगर – महिलांनी नेहमीच पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रामध्ये आपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडली आहे. तसेच विविध क्षेत्रात दिलेली जबाबदारी पार पाडून समाजामध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. राष्ट्रवादीच्या महिला शहर जिल्हाध्यक्षा रेश्मा आठरे यांनी मर्दानी महाराष्ट्राची या कार्यक्रमांतर्गत विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करून त्यांना त्यांच्या कामासंदर्भात प्रोत्साहन देऊन शाबासकीची थाप दिली. महिला या नेहमीच कुटुंबाबरोबरच देशाचा एक भक्कम आधार बनलेले आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.
नगर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनाचा निमित्ताने आयोजित मर्दानी महाराष्ट्राची कार्यक्रमांतर्गत करोनासारख्या भयंकर रोगाशी लढणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादीच्या महिला शहर जिल्हाध्यक्षा रेशमा आठरे, मनपा विरोधी पक्षनेता संपत बारस्कर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, पक्षीय निरीक्षक वर्षा शिवले, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, ऍड. शारदा लगड, मनिषा गुंड, निर्मला मालपाणी, सुनंदा कांबळे, सुनिता पाचारणे, यामध्ये डॉ.सोनाली बांगर, परिचारिका योगिता पंडित, अंगणवाडी सेविका कल्पना कोरेकर, आशा वर्कर अफसाना शेख, महिला पोलीस मनिषा पुरी, विजया माने तसेच जिल्हा रुग्णालयामध्ये रात्रंदिवस काम करणाऱ्या सेविका यांचा सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी आ. संग्राम जगताप म्हणाले की, मर्दानी महाराष्ट्राची या कार्यक्रमांतर्गत शहरातील महिला करोना योद्धा म्हणून आपली जबाबदारी पार पाडीत आहेत. त्याचबरोबर देशावर आलेल्या संकटाचा सामना करुन सर्वांना जास्तीत जास्त सहकार्य केले. त्यामुळे त्यांचा सन्मान करणे हा त्यांचा हक्कच आहे. या कार्यक्रमांर्गत त्यांचा सन्मान केल्यामुळे मला खूप आनंद होत असल्याचे ते म्हणाले.
यावेळी आठरे म्हणाल्या की, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तसेच आमदार जगताप यांच्या नेतृत्वाखाली आम्ही नगर शहरामध्ये विविध सामाजिक कार्यक्रम उपक्रम वर्षभर राबवत असतो.
महिलांच्या सुख-दुःखांत सामील होऊन त्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम करत आहोत. करोनाच्या काळामध्ये शहरातील विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांनी दिलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडले. त्यांच्या कामाचा गौरव होणे आमच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.