सासवड – ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून मिरवता यावे यासाठी पुरंदर तालुक्यातील अनेक गावपुढाऱ्यांनी जोरदार “फिल्डिंग’ लावली होती. तर प्रशासक म्हणून गावगाडा मीच हाकणार या तोऱ्यात ते वावरत होते व त्यासाठी पाण्यासारखा पैसाही खर्च केला होता. मात्र, तालुक्यातील 55 ग्रामपंचायतींचा गावगाडा चार विस्ताराधिकाऱ्यांवर सोपविल्याने या गावपुढाऱ्यांचे “मुसळ केरात’ गेल्याची चर्चा सध्या तालुक्यात रंगली आहे.
तालुक्यात एकूण 93 ग्रामपंचायती आहेत. त्यातील 63 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ टप्प्याटप्प्याने डिसेंबरपर्यंत संपत आहेत. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेता येत नसल्याने त्यातील 55 ग्रामपंचायतींवर आतापर्यंत प्रशासक नेमले आहेत.
दरम्यान, सुरुवातीला प्रशासक म्हणून गावातील सामाजिक कार्यकर्त्यांची निवड करण्यासंदर्भात निर्णय घेतला होता. परंतु त्याला आव्हान याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाच्या निर्णयामुळे प्रशासकपदावर “क’ वर्ग दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे न्यायालयाने आदेश दिले.
त्यामुळे राजकीय पदाधिकाऱ्यांची वर्णी ग्रामपंचायतीच्या प्रशासकपदावर लागणार होती, म्हणून गावपुढारी हवेत तरंगत होते. तर प्रशासकपदासाठी त्यांनी देव पाण्यात ठेवण्याबरोबरच पक्षश्रेष्ठींचे उंबरठेही झिजवले होते; मात्र त्यांच्या प्रयत्नांवर पाणी फेरून शासकीय अधिकाऱ्यांच्याच नियुक्त्या प्रशासकपदावर करण्यात येत असल्याने गावपुढारी थेट जमिनीवर आपटले
गेले आहेत.
प्रत्येकी डझनभर गावांचा भार – पुरंदर तालुक्यातील अवघ्या चार विस्तार अधिकाऱ्यांवर तब्बल 55 ग्रामपंचायतीचा कारभार सोपवल्याने त्यांच्या स्वाथ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आधीच ते वयाने ज्येष्ठ आहेत. त्यांना यापूर्वीच वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांनी ग्रासले आहे. प्रत्येक गावामध्ये अधिकचे अंतर असल्याने त्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. आधीच इतका कामाचा व्याप असताना आता पुन्हा प्रत्येकी डझनभर गावांचा कारभार पहावा लागणार असल्याने गावगाड्याला “ब्रेक’ लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.