मुंबई : राज्यात हनुमान चालिसावरुन शिवसैनिक आणि राणा दांपत्य यांच्यात चांगलेच रान पेटले आहे. राणा दांपत्याने मातोश्रीबाहेर येऊन हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिल्यापासून शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी राणा दाम्पत्यांना कडक इशाराच दिला आहे.
संजय राऊतांनी नागपुरात बोलताना म्हटले,“या घटनेकडे एक शिवसैनिक म्हणून जसे पाहायला हवे तसेच मी पाहत आहे. कोणाच्यातरी पाठबळाने तुम्ही मातोश्रीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असाल तर शिवसैनिक शांत बसतील का? सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी काय करावे हे सल्ले तुमच्याकडून ऐकून अंमलबजावणी करण्याचा भिकारीपणा महाराष्ट्राला आलेला नाही,” असेही संजय राऊत म्हणाले.
“आम्हाला धमक्या देऊ नका. राष्ट्रपती राजवट लागेल, केंद्रीय तपास यंत्रणा येतील, या धमक्या देऊ नका. हिंमत असेल तर सीबीआय लावा, ईडी लावा. आम्हाला त्रास द्या. आम्ही तुम्हाला घाबरत नाही. आता शिवसैनिकांवर कोणाचाही कंट्रोल नाही. अजून काहीच सुरु झालेलं नाही. दोन दिवसांपासून ज्या घटना पाहताय तुम्ही मुंबईत. या फक्त शिवसैनिकांच्या भावनांचा उद्रेक नाही, तर जनतेच्या भावनांचा हा स्फोट आहे. मी सध्या नागपुरात आहे. मी इथून सगळं वातावरण पाहतोय. तुम्ही आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न कराल, तर तुम्हालाही घरं आहेत. हे लक्षात घ्या.”, असं संजय राऊत म्हणाले.
“केंद्रीय पोलीस बलाचा वापर करुन आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न कराल तर आम्हाला रक्षणासाठी पोलिसांची गरज नाही. शिवसैनिक यासाठी सक्षम आहे. शिवसैनिक सदैव मरायला आणि मारायला तयार असतो. सरकार असल्यामुळे आमचे हात बांधलेले आहेत. केंद्र सरकार पुरस्कृत तुमच्या झुंडशाहीला शिवसैनिकांनी उत्तर दिले तर तुम्हाला मिरच्या का झोंबत आहे. तुम्ही आमच्यावर हात उगारण्याचा प्रयत्न केला तर शिवसैनिक शांत बसणार नाही,” असेही संजय राऊत म्हणाले.