अयोध्या: अयोध्येत येत्या 5 ऑगस्टला राम मंदिराचा भूमीपुजन सोहळा होत आहे त्या दिवशी पुर्व अनुमती शिवाय चॅनेलवर अयोध्येतून चर्चा करण्यास जिल्हा प्रशासनाने निर्बंध घातले आहेत.
अयोध्या प्रकरणातील कोर्ट केसमध्ये जो वादी किंवा प्रतिवादी राहिला आहे त्यांना या चर्चेत सहभागी करून घेता येणार नाही, तसेच अशा प्रकारच्या चर्चेत कोणत्याही धर्माच्या अथवा व्यक्तीच्या विरोधात मतप्रदर्शन करता येणार नाही असेही नियम जारी करण्यात आले आहेत.
अयोध्या विषयावर पुर्व परवानगी घेऊन आणि नियमावलीचा भंग केला जाणार नाही याची लेखी हमी घेऊनच वाहिनीवर चर्चा घेता येईल असेही अयोध्या जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अयोध्येतून जर एखाद्या वाहिनीतर्फे या दिवशी चर्चा किंवा कार्यक्रम प्रसारीत केला जाणार असेल तर त्या ठिकाणी मॅजिस्ट्रेट आणि पोलिसांना हजर ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.