कर्जत – कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील धार नदीवर शासनाने लाखो रुपये खर्चून केटी बंधारा बांधण्याचे काम सुरू केले आहे. मात्र ठेकेदाराकडून अत्यंत निकृष्ट दर्जाजे काम सुरू असल्याचे आरोप होऊ लागले आहेत. तसेच पहिल्याच पावसाळ्यात वाहून जाण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे, त्यामुळे ही योजना फक्त पाणी अडवा पैसे जिरवा साठीच आहे की काय ? अशी शंका ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
पावसाळ्यात पडणारे पाणी छोट्या मोठ्या नदी नाल्यातून वाहून जाऊ नये या करता शासनाच्या जलसंधारण, पाटबंधारे विभाग करोडो रुपये खर्च करून बंधारे बांधत आहेत. कोकणात प्रचंड प्रमाणात पडणाऱ्या पावसाचे वाहणारे पाणी अडवून जमिनीत जिरावे भूगर्भातील पाणी साठ्यात वाढ व्हावी आहेत. परिसरातील पाणी टंचाई दूर व्हावी. उन्हाळ्यात पाणी साठ्याचा वन्यजीवांना उपयोग व्हावा या उद्देशाने शासन स्तरांवर नेहमीच प्रयत्न केले जात आहे मागील अनेक वर्षांपासून मपाणी अडवा पाणी जिरवा, जलयुक्त शिवार, अशा विविध योजना महाराष्ट्र शासन राबवित आहे. मात्र काही ठिकाणी या योजनेत प्रचंड प्रमाणात गैरप्रकार होताना दिसून येत आहेत. अशाच प्रकार कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील धार नदीवर निदर्शनास आला आहे.
शासनाच्या जलसंधारण विभागा अंतर्गत वारे ग्रामपंचायत हद्दीतून वाहणाऱ्या धार नदीवर तीन कोकण टाइप सिमेंट कॉंक्रिटचे बंधारे बांधण्यात येत आहेत मात्र काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे आरोप ग्रामस्थ करत आहेत. बंधाऱ्याच्या फाउंडेशनमध्ये टाकण्यात आलेल्या सळ्या अत्यंत कमी गेज च्या असून चार ते पाच फूट अंतरावर केवळ जमिनीत उभ्या करून कॉंक्रिटचे काम होत असल्याचे निदर्शनास आले आहे, कॉंक्रिट मिश्रणात मध्ये 40 एम एम ची खडी आणी रेती ऐवजी दगडी भुसा (ग्रीड)चा वापर केला जात आहे. या बाबतीत वारे ग्रामस्थांनी चौकशी करून बांधकाम योग्य दर्जाचे करावे अशी मागणी केली आहे.
सध्या कर्मचारी वर्ग अपुरा असल्याने व कार्यालयापासून बांधकाम साइड दूर असल्याने समस्या निर्माण होत आहेत. तरीही सदरचे वारे येथील सुरू असलेल्या बंधाऱ्याच्या कामाची पाहणी करण्यात येईल. कामात काही त्रुटी आढळल्या त्या दूर करण्यात येतील.
– विलास देशमुख, उपविभागीय जलसंधारण अधिकारी, कर्जत
पूर्वीही वाहून गेले आहेत बंधारे
वारे ग्रामपंचायत हद्दीतील धार नदीवर या पूर्वीही कोकण टाइप बंधारे बांधण्यात आले होते, मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अल्पावधीतच बंधारे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. आजही धार नदी कोरडी आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही आजही तळपत्या उन्हात वन्यजीव पाण्यावाचून तडफडत आहेत. शासनाने जनतेच्या पैशातून मागील काही वर्षात याच नदी पात्रात पाच ते सहा सिमेंट कॉंक्रिटचे बंधारे ठराविक अंतरावर बांधले होते. मात्र सद्य स्थितीत एक ही बंधारा जागेवर सुस्थितीत नाही. खेदाची बाब म्हणजे यावर संबंधित विभागाचे नियंत्रण नाही. ठेकेदार आपल्या मर्जी प्रमाणे काम करत आहेत. मंजूर आराखड्या प्रमाणे काम होत नाही, परिणामी अश्या योजनांच्या माध्यमातून पाण्याऐवजी केवळ पैसा जिरवत असल्याचे चित्र दिसून येत आहे.