T. Raja Singh | Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुमारे 370 किल्ले जिंकले आहेत. मात्र, आज त्यातील 100 किल्ल्यांवर मशीद आणि दर्गा बांधण्यात आले. त्यामुळे किल्ल्यांवरील हे सर्व अतिक्रमण हटवण्याची मागणी भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांनी केली आहे.
तसेच, लोकसभा निवडणुकीत भाजपने 400 पेक्षा अधिक जागा जिंकल्या असत्या तर भारत हिंदू राष्ट्र झाले असते, असा दावाही यावेळी त्यांनी केला. भिवंडी तालुक्यातील पडघा येथे संत संमेलन आणि हिंदू धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या सभेस मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रक्षोभक वक्तव्य करणारे टी. राजा सिंह यांना आमंत्रीत करण्यात आले होते. त्यांच्या या कार्यक्रमावर विरोधी पक्षाच्या वतीने आधीच आक्षेप घेण्यात आला होता.
वक्फ बोर्ड रद्द करावा, अशी मागणी देखील टी. राजा यांनी या वेळी केली. महाराष्ट्रात 1 लाख एकर जमीन वक्फ बोर्डाच्या मालकीची आहे. भारतात 10 लाख एकर जमीन वक्फ बोर्डकडे आहे.
पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी वक्फ बोर्ड कायदा संपवून टाकावा, तसेच वक्फ बोर्डाच्या जमिनीवर हिंदूसाठी रुग्णालये, क्रीडांगण, महाविद्यालये, घरे बनवावीत असे आवाहन देखील आमदार टी. राजा सिंह यांनी केले आहे.
- धर्मसभेत महत्त्वाच्या ठरावांना मंजूरी
- धर्मांतर बंदी कायदा पारित करण्यात यावा
- वक्फ बोर्ड कायदा रद्द करण्यात यावा
- लव्ह जिहादविरोधी कायदा मंजूर करावा
- गोहत्या बंदी कठोर करून त्याची अंमलबजावणी व्हावी
- बेकायदेशीर भूमीवरील अतिक्रमण हटविण्यात यावे