मुंबई – शेअर बाजाराचे मुख्य निर्देशांक सोमवारी मोठ्या प्रमाणात कोसळले. त्याचा परिणाम भारतातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजवरही झाला. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचा शेअर आज चार टक्क्यांनी कोसळला.
त्यामुळे या कंपनीचे बाजार मुल्य एकाच दिवसात 68,404 कोटी रुपयांनी कमी झाले. ऑक्टोबर -डिसेंबर या तिमाहीत कंपनीला विक्रमी नफा झाल्याची माहिती गेल्या आठवड्यात कंपनीने जारी केली होती. त्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये कंपनीचा शेअर एक टक्क्यांने वाढला होता. नंतर शेअर बाजारात तुफान विक्री झाली. त्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीजला विक्रीचा मारा सहन करावा लागला.
बाजार बंद होताना शुक्रवारच्या तुलनेत रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर चार टक्क्यांनी कोसळून 2,377 रुपयांवर गेला. आता कंपनीचे बाजार मुल्य 16,08,275 कोटी रुपये इतके झाले आहे. तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा तब्बल 41 टक्क्यांनी वाढून 18,549 कोटी रुपये इतका झाला आहे. लॉक डाऊनच्या काळात कंपनीने बरेच भागभांडवल उभा केल्यामुळे कंपनीवर आता कसलेही कर्ज नाही.