मुंबई – भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक बऱ्याच उच्च पातळीवर असल्यामुळे काही गुंतवणूकदारांनी नफा काढून घेतल्यामुळे 2022 या वर्षाच्या अखेरच्या दिवशी शेअर बाजार निर्देशांकात अर्धा टक्क्यापर्यंत घट झाली. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 293 अंकांनी कमी होऊन 60,840 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 85 अंकांनी म्हणजे 0.47% ने कमी होऊन 18,105 अंकावर बंद झाला.
याबाबत विश्लेषकांनी सांगितले की, जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश येऊनही काही गुंतवणूकदारांनी नफा काढून घेत 2022 वर्षाचा ताळेबंद बंद केला. या कारणामुळे शेअर बाजार निर्देशांकात घट झाली असल्याचे त्यांना वाटते. आयसीआयसीआय बॅंक, भारती एअरटेल, एचडीएफसी, आयटीसी, नेस्ले, लार्सन अँड ट्यूबरो, एशियन पेंट्स, महिंद्रा, पावर ग्रीड, इंडसइंड बॅंक या कंपन्यांना नफेखोरीचा फटका बसला.
बजाज फिन्सर्व, टायटन, बजाज फायनान्स, टाटा स्टील, टाटा मोटर्स, विप्रो, कोटक महिंद्रा बॅंक, टेक महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज, स्टेट बॅंक या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाल्यामुळे निर्देशांक जास्त प्रमाणात कोसळले नाहीत. जागतिक बाजारात आज सकारात्मक वातावरण होते. जपान, चीन, हॉंगकॉंग येथील शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले होते. अमेरिकेतील शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले होते. मात्र युरोपातील शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले होते.
सकाळी बरीच खरेदी झाली होती. मात्र दुपारी नफेखोरी वाढल्यामुळे निर्देशांक कमी झाले. परदेशी गुंतवणूकदाराकडून मात्र भारतीय शेअर बाजारात विक्री चालूच असून गुरुवारी या गुंतवणूकदारांनी 572 कोटी रुपयांची शेअरची विक्री केल्याची आकडेवारी शेअर बाजाराने जारी केली. मात्र आता अमेरिकेमध्ये व्याजदर वाढ कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात परदेशी संस्थागक गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात खरेदी करतील अशी आशा व्यक्त करण्यात येऊ लागली आहे.
नव्या वर्षातील शेअर बाजाराच्या कामगिरी बाबत बोलताना जिओजी वित्तीय सेवा या संस्थेचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले की, गेल्या वर्षाप्रमाणेच यावर्षीही शेअर बाजारावर मंदीचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. किमान पहिले तीन महिने तरी व्याजदर वाढीमुळे शेअर बाजार निर्देशांक अस्थिर राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर परिस्थिती कशी बदलते यावर निर्देशांकाची पुढील वाटचाल अवलंबून राहील.