मुंबई – भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून नकारात्मक बाबी एकदाच घडून येत आहेत. क्रुडच्या किमती वाढल्या आहेत. त्याचबरोबर परकीय गुंतवणूक भारतातून परत चालली आहे. रुपयाचे मूल्य कोसळले आहे. भारतात महागाई वेगात वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे अगोदरच भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक कमी पातळीवर असूनही आज त्यामध्ये मोठी घट झाली.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स सोमवारी 1,491 अंकांनी कोसळून 52,842 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 382 अंकांनी म्हणजे 2.35 टक्क्यांनी कोसळून 15,863 अंकांवर बंद झाला.
निर्देशांक कोसळत असल्याबद्दल ट्रेडिंगो संस्थेचे पार्थ न्याती यांनी सांगितले की, युध्दामुळे क्रुडचे दर भयंकर वाढत आहेत. त्याचा भारतावर परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबर जागतिक शेअर बाजाराचे निर्देशांकही कोसळत असल्यामुळे भारतीय शेअर बाजारात विक्री होत आहे.
इंडस इंड बॅंक, ऍक्सिस बॅंक, मारुती सुझुकी, बजाज फायनान्स, बजाज फिन्सर्व, अल्ट्राटेक सिमेंट, महिंद्रा या कंपन्यांच्या शेअरच्या भावात 8 टक्क्यापर्यंत वाढ झाली. एअरटेल, एचसीएल टेक्नॉलॉजी, टाटा स्टील, इन्फोसिस या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडेफार वाढ होऊ शकली.
बॅंकिंग, वित्त, वाहन रिअल्टी क्षेत्रासह सर्वच क्षेत्राच्या निर्देशांकामध्ये सोमवारी घट झाली. अमेरिका, युरोप, चीन, दक्षिण कोरिया, जपान मधील शेअर बाजाराचे निर्देशांक मोठ्या प्रमाणात कोसळले. परदेशी संस्थागत गुंतवणुकदारांनी शुक्रवारी 7,631 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. त्यामुळे निर्देशांकावर जास्त परिणाम होत आहे.