मुंबई – भारतातील बहुतांश राज्यामध्ये समाधानकारक पाऊस पडत आहे. कंपन्या चांगले ताळेबंद जाहीर करत आहेत. व्याजदर वाढीची शक्यता कमी आहे. परदेशातून गुंतवणूक वाढत आहे. या कारणामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक रोज नव्या विक्रमी पातळीवर जात आहेत. आज सलग पाचव्या दिवशी शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 302 अंकांनी वाढून 67,097 या विक्रमी पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 83 अंकांनी म्हणजे 0.42 टक्क्यांनी वाढून 19,833 अंकावर बंद झाला. ही निर्देशांकाची विक्रमी पातळी आहे.
आता निफ्टी लवकरच 20,000 अंकाचा टप्पा ओलांडेल असे गुंतवणूकदार बोलत आहेत.
रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आयटीसी या दोन कंपन्यांच्या शेअरच्या भावात भक्कम वाढ झाल्यामुळे निर्देशांकांना आधार मिळाला. त्याचबरोबर एनटीपीसी, बजाज फायनान्स, इंडसइंड बॅंक, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फिनसर्व, स्टेट बॅंक, टाटा मोटर्स, आयटीसी, पावर ग्रीड या कंपन्यांनी तेजीचे नेतृत्व केले. मात्र टीसीएस, एअरटेल, मारुती नेस्ले, आयसीआयसीआय बॅंक या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.
रॅलीगेअर ब्रोकिंगचे संशोधक अजित मिश्रा यांनी सांगितले की, सध्या केवळ काही क्षेत्रातील शेअरची खरेदी चालू असल्याचे दिसत आहे. मुख्य निर्देशांकाबरोबर मिडकॅप 0.63 टक्क्यांनी व स्मॉल कॅप 0.61 टक्क्यांनी वाढले. त्याचबरोबर दूरसंचार, ऊर्जा, ग्राहक वस्तू, वित्तीय सेवा या क्षेत्राच्या निर्देशांक वाढ झाली. 1,998 कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली तर 1,413 कंपन्यांचे शेअरच्या भावात घट झाली.
परकीय गुंतवणुकीचा ओघ
देशाची स्थूल अर्थव्यवस्था भक्कम असल्यामुळे देशातील गुंतवणूकदार शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी करीत असल्याचे वातावरण आहे. अमेरिकेमध्ये व्याजदर वाढ होणार नसल्यामुळे अमेरिकेतील बरीच गुंतवणूक भारतात येत असल्याचे वातावरण आहे. मंगळवारी परदेशी संस्था गुंतवणूकदारांनी 2,115 कोटी रुपयांच्या शेअरची भारतीय शेअर बाजारात खरेदी केली. जर परदेशी संस्थगत गुंतवणूकदारांनी खरेदी चालू ठेवली तर निर्देशांक आणखी उंचावण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.