मुंबई – जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश येण्याबरोबरच रिझर्व्ह बॅंकेचे पतधोरण मवाळ असण्याची शक्यता गुंतवणूकदारांना वाटत आहे. लवकरच सुरू होणाऱ्या उत्सवामध्ये खरेदी वाढेल असे समजणाऱ्या गुंतवणूकदारांनी गुरुवारी बरीच खरेदी केल्यामुळे शेअर बाजार निर्देशांकांत भरघोस वाढ झाली.
आजच्या तेजीचे नेत्रुत्व टायटन, टीसीएस, आयसीआयसीआय बॅंक, महिंद्रा, इंडसइंड बॅंक, ऐशियन पेंट्स, सनफार्मा, टीसीएस, टेक महिंद्रा या कंपन्यांनी केले. डॉक्टर रेड्डीज एचडीएफसी, बजाज फिन्सर्व, हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 488 अंकांनी ऊसळून 59,677 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 144 अंकांनी म्हणजे 0.42 टक्क्यांनी वाढून 17,790 अंकांवर बंद झाला. बाजारातील तेजीबद्दल बोलताना सीकेपी सिक्युरिटीजचे विश्लेषक रंगनाथन यांनी सांगितले की, रिझर्व्ह बॅंक फारशी कडक भूमिका घेणार नाही, असे बऱ्याच गुंतवणूकदारांना वाटत आहे.
उत्सवाच्या काळामध्ये वाहन विक्री वाढेल, यामुळे वाहन कंपन्या, ग्राहक वस्तू आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची खरेदी झाली. केंद्र सरकारने वस्त्रोद्योग वाढण्यास योजना जाहीर केल्या आहेत. त्यामुळे या क्षेत्राकडेही गुंतवणूकदारांचा ओढा होता. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे ताळेबंद चांगले असतील या हेतूने आज माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली.
टायटन कंपनीची उलाढाल आणि नफा वाढत जाण्याची शक्यता असल्यामुळे आज या कंपनीच्या शेअरचा भाव मोठ्या प्रमाणात वाढला. टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टालिन यांची भेट घेतली. टाटा मोटर्सच्या अनुषंगाने या भेटीत चर्चा झाली असण्याची शक्यता असल्यामुळे आज टाटा मोटर्सच्या शेअरच्या भावात वाढ नोंदली गेली.
छोट्या कंपन्यांच्या शेअरचे भाव वाढल्यामुळे मिड कॅप व स्मॉल कॅपमध्ये भरघोस वाढ नोंदली गेली. रिझर्व्ह बॅंक नेमके कसे धोरण जाहीर करते आणि कंपन्या कशा ताळेबंद जाहीर करतात यावर निर्देशांकाचे पुढील भवितव्य अवलंबून असल्याचे सांगितले जाते