लाहोर – भारतापेक्षा पाकिस्तानकडे जास्त गुणवान खेळाडू असून आगामी आयसीसी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तानचा संघ भारताला ते सिद्ध करून दाखवेल, अशी मुक्ताफळे पाकिस्तानचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू अब्दुल रझाकने उधळली होती. त्यावर भारतीय संघाच्या चाहत्यांनी टीका केली असून भारतीय क्रिकेट संघ किती भक्कम आहे ते 24 ऑक्टोबरला दिसेल, अशा शब्दात रझाकची खिल्ली उडवली आहे.
रझाक कायमच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांवरून चर्चेत असतो. मागे एकदा जसप्रीत बुमराह हा सामान्य गोलंदाज असून त्याच्या प्रत्येक चेंडूवर मी षटकार मारू शकतो, असे विधानही त्याने केले होते. तेव्हाही त्याच्यावर भारतीय संघाचे चाहते बरसले होते.
भारतीय संघ पाकिस्तानपेक्षाही कमी दर्जाचा आहे. पाकिस्तानमध्ये आजच्या घडीला जी गुणवत्ता आहे, ती भारतीय क्रिकेट संघात नाही, असे वक्तव्य रझाकने केले आहे.
भारत पाकिस्तानशी स्पर्धा करू शकेल असे मला वाटत नाही. पाकिस्तानमध्ये ज्या प्रकारची प्रतिभा आहे, ती पूर्णपणे वेगळी आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामने होत नाहीत, हे क्रिकेटसाठी चांगले नाही. खेळाडूंना ते किती दबाव हाताळू शकतात हे दाखवण्याची संधी होती, पण या दोघांत सामने झाले असते, असेही मत त्याने व्यक्त केले आहे.
येत्या 24 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान आयसीसी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत एकमेकांशी खेळणार आहेत. या सामन्यात भारतीय संघ किती सरस आहे याची प्रचिती पाकिस्तानला येईलच, अशा शब्दात रझाकवर टीका होत आहे. इंग्लंडमध्ये 2019 सालच्या विश्वकरंडक स्पर्धेनंतर हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने येत आहेत.