मुंबई- गेल्या चार कामकाजाच्या दिवसात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक तब्बल 1,613 अंकांनी म्हणजे तीन टक्क्यांनी कोसळला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचे मूल्य चार दिवसात 13.32 लाख कोटी रुपयांनी कमी झाले.
आता शेअर बाजारावर नोंदलेल्या सर्व कंपन्यांचे एकत्रित बाजारमुल्य 246 लाख कोटी रुपयापर्यंत आले आहे. यासंबंधात बोलताना कोटक सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक श्रीकांत चव्हाण यांनी सांगितले की, शेअर बाजाराच्या दृष्टिकोनातून चौफेर नकारात्मक परिस्थिती आहे. महागाई वाढणार असल्यामुळे भारतातील विकास दर कमी होणार आहे.
जागतिक पातळीवर महागाई वाढत असल्यामुळे परकीय गुंतवणूक परत जात आहे. रशिया- युक्रेन युद्धामुळे कच्या तेलासह भारत आयात करीत असलेल्या विविध वस्तूंचे दर वेगाने वाढत आहेत. अशा परिस्थितीमध्ये आगामी काळात औद्योगिक उत्पादनावर नकारात्मक परिणाम होऊन कंपन्यांचे नफे कमी होण्याची शक्यता आहे.
अशा परिस्थितीमध्ये शेअर बाजारातून गुंतवणूक बाहेर चालली आहे. जोपर्यंत महागाई आटोक्यात येत नाही. तोपर्यंत सोने-चांदी आणि बॅंकांच्या ठेवीमध्ये गुंतवणूक वाढण्याची शक्यता असल्याचे दिसून येत आहे. सध्या अनेक आघाड्यावर नकारात्मक परिस्थिती असल्यामुळे गुंतवणूकदार अतिशय सावध राहून व्यवहार करण्याची शक्यता आहे. फक्त काही ब्ल्यू चीप कंपन्यांमध्ये निवडक प्रमाणात खरेदी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.