मुंबई – जागतिक बाजारातून संमिश्र संकेत आले असतानाच भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक उच्च पातळीवर असल्यामुळे काही गुंतवणूकदारानी नफेखोरी केल्यामुळे सोमवारी शेअर बाजाराचे निर्देशांक विक्रमी पातळीवरून कमी झाले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 170 अंकांनी कमी होऊन 61,624 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 20 अंकांनी म्हणजे 0.11 टक्क्यांनी कमी होऊन 18,329 अंकावर बंद झाला.
डॉक्टर रेड्डीज, आयटीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, स्टेट बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, महिंद्रा, लार्सन अँड टुब्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्यांना विक्रीचा फटका बसला. तर कोटक महिंद्रा बॅंक, टाटा स्टील, पावर ग्रीड, इंडसइंड बॅंक, इन्फोसिस व मारुती या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली.
घाऊक महागाई कमी होऊन 91 महिन्याच्या निचांकावर आली आहे. या महागाईचा दर ऑक्टोबर महिन्यात 8.39% इतका मोजला गेला आहे. यामुळे महागाई खात्रीने कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र निर्देशांक उच्च पातळीवर असल्यामुळे गुंतवणूकदारांनी या आकडेवारीकडे दुर्लक्ष करून नफा काढून घेतल्याचे दिसून आले.
जागतिक संस्थागत गुंतवणूकदाराकडून मात्र भारतामध्ये खरेदी चालूच असल्याचे वातावरण असून शुक्रवारी या गुंतवणूकदारानी 3,958 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. सध्या भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक उच्च पातळीवर असल्यामुळे आगामी काळात बरेच गुंतवणूकदार नफा काढून घेण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र दीर्घ पल्ल्याचा विचार करून खरेदी करणारे खरेदी करण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये निर्देशांक अस्थिर राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.