मुंबई – गेल्या काही दिवसात शेअर बाजार निर्देशाकांनी जोरदार विक्रीमुळे सपाटून मार खाल्ला होता. मात्र आज बाजारात उमेद परतली. बॅंका आणि वित्तीय कंपन्यांच्या शेअरची जोरदार खरेदी झाल्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक दोन टक्क्यांपर्यंत वाढले. मात्र गेल्या आठवड्यात झालेला घसारा आणखी पूर्णपणे भरून निघालेला नाही.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1,030 अंकांनी उसळुन 50,781 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 274 अंकांनी वाढून 14,982 अंकांवर बंद झाला.
ऍक्सिस बॅंक, एचडीएफसी बॅंक, एचडीएफसी, स्टेट बॅंक, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बॅंक या कंपन्यांनी तेजीचे नेतृत्व केले तर उमेदीच्या वातावरणातही डॉ.रेड्डीज, पावर ग्रीड, टीसीएस, एशियन पेंट्स यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.
शेअर बाजारच्या बाजाराच्या कामकाजावर दूरसंचार क्षेत्रातील तांत्रिक बिघाडामुळे परिणाम झाल्याने 11.40 वाजता कामकाज बंद करावे लागले. त्यानंतर 3.45 वाजता कामकाज सुरू होऊ शकले. यामुळे कामकाजाचा कालावधी पाच वाजेपर्यंत वाढविण्यात आला होता.
गेल्या आठवड्यामध्ये सरकारी रोख्यावरील परतावा वाढल्याने गुंतवणूकदार उदासीन झाले होते. मात्र यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न चालू असल्यामुळे बुधवारी शेअर बाजारात उमेद परतली. मात्र तरीही निर्देशांक उच्च पातळीवर असल्यामुळे गुंतवणूकदार आता सावध राहण्याची शक्यता आहे. त्यातल्या त्यात करोना आजार कसे रूप धारण करतो याकडे बऱ्याच जणांचे लक्ष आहे.