मुंबई – विकासदराला चालना देणारा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी जाहीर केल्यानंतर शेअर बाजार निर्देशांकात एकतर्फी वाढ झाली. शुक्रवारी रिझर्व्ह बॅंकेचे पतधोरण जाहीर होताना बऱ्याच गुंतवणूकदारांना व्याजदर वाढीची शंका असल्यामुळे सकाळच्या सत्रात शेअरबाजारात खरेदी-विक्रीच्या मोठ्या लाटा आल्या.
व्याजदर वाढ नसलेले पतधोरण जाहीर झाल्यानंतर खरेदी वाढल्यामुळे कालच्या तुलनेत शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले आणि नव्या विक्रमी पातळीवर गेले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 0.23 टक्क्यांनी म्हणजे 117 अंकांनी वाढून 50,731 अंकांवर बंद झाला. काही काळ सेन्सेक्स 51 हजार अंकाच्या पुढे गेला होता. विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 28 अंकांनी वाढून 14,924 अंकावर बंद झाला.
निफ्टि काही काळ मानसिक दृष्टया महत्त्वाच्या असलेल्या 15,000 पातळीच्या पुढे गेला होता. गेल्या चार दिवसांमध्ये निर्देशांकांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्या तुलनेत आज निर्देशांकात कमी प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले.
रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात वाढ केली नाही. त्याचबरोबर मुबलक भांडवल सुलभतेचे आश्वासन दिल्यामुळे खरेदी कायम राहिली. अर्थसंकल्पात केंद्र सरकारने सरकारी बॅंकांना 20 हजार कोटी रुपयांची भांडवली मदत जाहीर केली आहे. त्याचबरोबर दोन बॅंकांचे खाजगीकरण केले जाणार आहे.
या कारणामुळे सोमवारपासून सरकारी बॅंकांच्या शेअरचे भाव वाढत आहेत. ही वाढ आजही कायम राहिली. त्याचबरोबर औषधी आणि ग्राहक वस्तू क्षेत्राचे निर्देशांकही वाढले. जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आल्यामुळे निर्देशांकांची आगेकूच चालू राहिली असल्याचे रिलायन्स सिक्युरिटीजचे संशोधक विनोद जोशी यांनी सांगितले.