मुंबई – गेल्या आठवड्याच्या शेवटी रिलायन्स इंडस्ट्रीजने आपला ताळेबंद जाहीर केला. या ताळेबंदामुळे बऱ्याच गुंतवणूकदारांनी रिलायन्स कंपनीच्या शेअरची जोरदार विक्री केली. त्याचबरोबर परकीय संस्थागत गुंतवणूकदार पुन्हा विक्री करीत असल्यामुळे सोमवारी भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक सहा दिवसानंतर कमी झाले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 306 अंकांनी कमी होऊन 55,766 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 88 अंकांनी म्हणजे 0.53 टक्क्यांनी कमी होऊन 16,631 अंकावर बंद झाला.
कोटक सेक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक श्रीकांत चव्हाण यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यामध्ये निर्देशशंक बराच वाढले होते. मात्र दरम्यानच्या काळात तयार झालेल्या नकारात्मक वातावरणामुळे तेल आणि नैसर्गिक वायू, दूरसंचार, वाहन इत्यादी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची विक्री करून गुंतवणूकदारांनी नफा काढून घेणे पसंत केले.
याच आठवड्यात होणाऱ्या फेडरल रिझर्व्हच्या पतधोरणाकडे आता गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. रिझर्व्ह किती प्रमाणात व्याजदर वाढ करते यावर भारतीय शेअर बाजाराची त्याचबरोबर जगातील इतर शेअर बाजाराची दिशा अवलंबून राहील असे समजले.
आज रिलायन्स इंडस्ट्रीजबरोबरच महिंद्रा. मारुती सुझुकी. कोटक महिंद्रा बॅंक. अल्ट्राटेक सिमेंट. टेक महिंद्रा या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. टाटा स्टील, इंडसइंड बॅंक, एचसीएल टेक्नॉलॉज, विप्रो, एनटीपीसी या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाल्यामुळे निर्देशांकांना आधार मिळाला. जीओजी वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक व्ही के विजयकुमार यांनी सांगितले की, भारतातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीचा शेअर कोसळल्यामुळे निर्देशांकांना आधार मिळाला नाही.
गेल्या आठवड्यात परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात बरीच खरेदी केली होती. मात्र शुक्रवारी या गुंतवणूकदारांनी 675 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. त्यामुळे आजही या गुंतवणूकदारानी विक्री केली असण्याची शक्यता आहे. लवकरच जाहीर होणाऱ्या अमेरीकेतील पतधोरणामुळे अमेरिकेसह जगातील इतर सर्वच शेअर बाजाराच्या निर्देशांकामध्ये घट झाली. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही झाला असल्याचे दिसून येते.