मुंबई – भारतीय संघातून सुमार कामगिरीमुळे स्थान गमावलेल्या अजिंक्य रहाणे याला आता आयपीएल स्पर्धेतही अपयश आल्याने कोलकाता नाईट रायडर्सने त्याला बेंचवर बसवण्याचा निर्णय घेतला. पहिले पाच सामने त्याला खेळवण्यात आले होते. मात्र, त्यातही तो चमकदार कामगिरी करू शकला नाही त्यामुळे आता त्याला प्लेइंग इलेव्हनमध्येही स्थान दिले जात नाही. त्याच्या याच सुमार प्रदर्शनामुळे त्याची कारकीर्दच धोक्यात आल्याचे संकेत मिळत आहेत.
भारतातील नव्हे तर जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असे संबोधले जात असलेल्या आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात रहाणेला कोलकाता संघाने आपल्याकडे घेतले होते. त्याच्या गुणवत्तेवर विश्वास दाखवत त्याला पहिले पाच सामनेही खेळवण्यात आले. मात्र, या पाचही सामन्यांत मिळून त्याने केवळ 80 धावा केल्याने त्याला संघातून डच्चू देत बेंचवरच ठेवण्यात येत आहे. त्यामुळे भारतीय संघातून यापूर्वीच वगळलेल्या रहाणेची आयपीएल स्पर्धेतील कारकीर्दही संपण्याच्या मार्गावर आहे.
आता रहाणेच्या जागी ऍरन फिंचची संघात निवड करण्यात आली असून सुनील नरेन आणि सॅम बिलिंग्स यांनाही संधी देण्यात आली आहे.
रहाणेला भारतीय संघातून यापूर्वीच बाहेर केले गेले होते. तसेच श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत निवड समितीने त्याला संधी दिली नाही. कसोटी संघाचे उपकर्णधारपदही त्याच्याकडून काढून घेण्यात आले आहे.
आयपीएलची संधीही हुकली
आयपीएलमध्ये सरस कामगिरी करून भारतीय संघात पुनरागमन करण्याची आलेली संधीही रहाणेने वाया घालवली आहे. रहाणेने आयपीएलमध्ये 153 सामने खेळले असून त्याच्या नावावर 3 हजार 941 धावा आहेत. मात्र, आता यंदाच्या मोसमात सातत्याने अपयशी ठरल्यामुळे त्याच्या भवितव्याबाबत शंकाही उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत.