नगर -चितळे रोड, तेलीखुंट, दाळमंडईसह संपूर्ण बाजारपेठेची खड्डे आणि धुळीमुळे भग्नावस्था झाली आहे. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. शहर कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी आज बाजारपेठेमध्ये व्यापाऱ्यांशी संवाद साधत धुळ व खड्डेमुक्त बाजारपेठेच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम राबविली. यामध्ये 1 हजारहून अधिक व्यापाऱ्यांनी स्वाक्षरी केल्या.
स्वाक्षरी मोहिमेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होत महापालिकेच्या यंत्रणेवरील आपला रोष व्यापाऱ्यांनी व्यक्त केल्या. मनपा आयुक्तांनी जाहीर केलेल्या 100 पूर्ण झालेल्या रस्त्यांमध्ये मात्र कॉंग्रेसने स्वाक्षरी मोहिम राबविलेल्या बाजारपेठेतील एकाही रस्त्याचा समावेश नसल्याचे कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आलेल्या पाहणीमध्ये आढळून आल्याचे कॉंग्रेसने म्हटले आहे. त्यामुळे आयुक्त हे खोटारडे असून नगरकरांची फसवणूक करत असल्याचा आरोप किरण काळे यांनी केला आहे.
यावेळी व्यापाऱ्यांनी काळे यांच्या समोर आपल्या व्यथा मांडल्या. महापालिका कर संकलन करते. मात्र संपूर्ण बाजारपेठ खोदून ठेवली आहे. त्यामुळे धुळीचे साम्राज्य पसरले आहे. व्यवसाय निम्म्याहून कमी झाला आहे. त्यामुळे आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. महागाईचा फटका आम्हाला सुद्धा बसला आहे. आधीच करोनामुळे मागचे दोन वर्ष हे व्यवसायासाठी अडचणीचे गेले आहेत. ग्राहक खड्डे आणि धुळीमुळे बाजारात यायला तयार नाहीत. महापालिकेच्या अधिकारी, ठेकेदारांना काही बोलायला गेलं तर ते उडवाउडवीची उत्तरे देतात, असे म्हणत व्यापाऱ्यांनी महापालिके संदर्भात असलेला आपला रोष काळे यांच्यासमोर व्यक्त केला.
कॉंग्रेसने राबविलेल्या स्वाक्षरी मोहीमनंतर व्यापाऱ्यांच्या सह्यांच्या निवेदनासह कॉंग्रेस पदाधिकारी काळे यांच्या नेतृत्वाखाली व्यापाऱ्यांसमवेत महापालिका आयुक्तांची लवकरच भेट घेणार आहेत. यातून तातडीने महापालिकेने तोडगा न काढल्यास पुढील भूमिका ठरवणार असल्याचे ब्लॉक कॉंग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा यांनी सांगितले. यावेळी खलील सय्यद, दशरथ शिंदे, अनंतराव गारदे, प्रविण गीते, अनिस चुडीवाल, प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, जितेंद्र तोरणे, विशाल घोलप, उषा भगत, जरीना पठाण, राणी पंडित, जुबेर सय्यद, शारदाताई वाघमारे, हेमलता घाडगे, अमृता कानडे आदी कार्यकर्त्यांसह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.