औंध – औंध ते सांगवी फाटा मार्गावरील जुना पूल कमकुवत झाला होता. तो पाडून नवीन पूल बांधण्यात आला. वर्षभरात हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु त्याला दोन वर्षे होऊन गेली. आता हे काम पूर्ण झाले आहे. इतके दिवस भाजप नेते आणि आता मनपा प्रशासनाने हा पूल सुरू करण्यात चालढकल सुरूच ठेवली आहे. त्यामुळे माजी नगरसेवक कैलास गायकवाड यांनी आंदोलन करत हा पूल नागरिकांसाठी मंगळवारपासून खुला केला.
हा रस्ता बंद असल्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक राजीव गांधी पुलावरून होत होती. त्यामुळे औंध मुख्य रस्त्यावर ताण येत होता. दरररोज सकाळ-सायंकाळ मुख्य रस्ता पूर्णपणे वाहतूक कोंडीत सापडत होता. येथे हॉस्पिटल्स, शाळा, महाविद्यालये व आयटी कंपन्या असल्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे या सर्व नागरिकांची गैरसोय लक्षात घेता, हा रस्ता खुला केल्याचे गायकवाड म्हणाले. यावेळी मदन मारुडा, शंकर गावडे, गोकुळ पाटोळे, दत्ता इजगज, राजु शिंदे, सचिन म्हात्रे, संभाजी कांबळे तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
गेले अनेक दिवस हा पूल बंद असल्यामुळे येथील रहदारी पूर्णपणे बंद होती. त्यामुळे ग्राहक नसल्यामुळे येथील व्यावसायिक नुकसान सहन करत आहेत. या ठिकाणी काही शॉपिंग मॉलदेखील आहेत. रस्ताच बंद असल्यामुळे येथील व्यावसायिकांकडे येणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी झाली होती. अनेक रिक्षाचालकांना या भागातील प्रवासी मिळत नव्हते. त्यामुळे आंदोलन करत हा रस्ता खुला केला आहे.
– कैलास गायकवाड, माजी नगरसेवक