- नागरिकांचा प्रवास घटलेलाच; सर्वसामान्यांना दिलासा
पिंपरी – करोना महामारीमुळे जवळपास सर्वच क्षेत्राला आर्थिक फटका बसला आहे. यातून एसटी महामंडळही वाचलेले नाही. करोनाच्या अटी टप्प्या-टप्प्याने शिथिल होऊन एसटीची लालपरी रस्त्यावर धावत असली तरी प्रवाशांना प्रतिसाद अद्यापही कमी प्रमाणातच मिळत आहे. त्यामुळे प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी आणि दिलासा देण्याच्या हेतूने दरवर्षी होणारी 10 ते 20 टक्के दरवाढ यंदा होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.
करोनामुळे लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे जनजीवन ठप्प झाले होते. याचा प्रचंड मोठा फटका एसटी महामंडळाला बसला आहे. गेल्या दिड महिन्यापासून एसटी टप्प्याटप्याने सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद अद्यापही मिळत नसल्याने महामंडळाला कर्मचाऱ्यांचा पगार देणेही मुश्किल बनले आहे. दिवाळीच्या कालावधीत एसटीला मोठ्या उत्पनाची अपेक्षा असते.
मात्र, यंदा करोनामुळे प्रवाशांची संख्या अत्यंत कमी झाल्याने महामंडळाकडून तिकीटाच्या दरवाढीऐवजी प्रवाशांना आकर्षित करण्यावर भर दिला जाणार आहे. दरवर्षी पिंपरी-चिंचवड येथील वल्लभनगर आगारात दिवाळीनिमित्त गाड्यांचे मोठे नियोजन केले जाते. मात्र, करोनामुळे हजारो कामगार यापर्वीच घराकडे परतले आहेत. घराकडून नुकतेच आलेले कामगार पुन्हा लगेच माघारी जाण्याची शक्यताही कमी असल्याने वल्लभनगर आगाराकडून ठराविक ठिकाणीच बसेसचे नियोजन करण्यात आल्याची माहिती वल्लभनगर आगाराकडून देण्यात आली.