लाखो भाविकांची उपस्थिती ः वीर यात्रेला सुरुवात
परिंचे-श्री क्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्रीनाथ म्हस्कोबा व श्रीदेवी जोगेश्वरी यांचा लग्न सोहळा फटाक्यांची आतषबाजी, धुमधडाक्यात पार पडला. यावेळी मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. देवाच्या लग्न सोहळ्याने पंधरा दिवस चालणाऱ्या वीर यात्रेला सुरुवात झाली.
शनिवारी (दि. 8) संध्याकाळी मानाच्या कोडीत (ता. पुरंदर) येथील पालखीने राऊतवाडी येथील हळदीचा मान स्वीकारून संध्याकाळी सातच्या दरम्यान श्री क्षेत्र वीर येथे वेशीवर आगमन झाल्यावर वीर मंडळींच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर दक्षिण दरवाजाने सर्व मानाच्या काठ्या आणि कोडीतची पालखी देऊळवाड्यात गेली. दोन मंदिर प्रदक्षिणा झाल्यावर रात्री बाराच्या दरम्यान मानकरी राऊत मंडळींच्या वतीने देवाला पोशाख, मंडवळ्या, अलंकार करून एक वाजता सवाई सर्जाचं चांगभलं जयघोष करत सर्व देवांना लग्नासाठी आवाहन करण्यात आले.
रात्री दीड वाजता दक्षिण दरवाजाने कोडीत बरोबरच राजेवाडी, भोंडवेवाडी, सोनवडी, पुणे, कण्हेरी, सुपे आदी काठ्या अंधारचिंच येथे दाखल झाल्या. त्या ठिकाणी कण्हेरी आणि वाई या काठ्यांची पारंपरिक भेट झाली. तरडे, ढवाण, व्हटकर, बुरुंगुले, शिंगाडे या मानकऱ्यांनी फुलाच्या माळा घातल्या. मानपान झाल्यानंतर रात्री दोनच्या सुमारास सर्व काठ्या आणि कोडीत, कण्हेरी, राजेवाडी, भोंडेवाडी, पुणे, वीर, वाई, सोनवडी या सात पालख्या सवाद्य देऊळवाड्यात दाखल झाल्या. प्रथेप्रमाणे सर्व काठ्या व पालख्यांची मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर सर्व मानकरी, पुजारी, विश्वस्त, भाविकांच्या उपस्थितीत प्रसाद गुरव, प्रदीप गुरव, मंगेश क्षीरसागर, गिरीश क्षिरसागर यांनी उत्सव मूर्तींना अलंकार व पोषाखांनी सजविण्यात आले.
गुरव समाजाच्या वतीने अक्षदा वाटप केल्यानंतर मध्यरात्री अडीच वाजता ग्राम पुरोहीत संतोष थिटे, दिपक थिटे, केतन वाघ यांनी मंत्रोच्चार सुरुवात करुन गावचे मुकादम पाटील बाळासाहेब ज्ञानोबा धुमाळ यांच्या हस्ते श्री नाथ मस्कोबा महाराज आणि माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा पार पडला.