भारताचा शेजारी देश असणाऱ्या श्रीलंकेमध्ये नुकत्याच झालेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकांमध्ये उदारमतवादी, कल्याणकारी लोकशाहीच्या संकल्पनेची मांडणी करणाऱ्या व आश्वासन देणाऱ्या साजिथ प्रेमदासा यांना नाकारत मतदारांनी गोताबाया राजेपक्षे यांच्या प्रखर राष्ट्रवादाला भरभरुन कौल दिला आहे. त्यांच्या निवडीनंतर श्रीलंकेतील मुस्लिम व तामिळ अल्पसंख्याकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राजेपक्षे यांनी अल्पसंख्याकांच्या विरोधात अत्यंत कडवी धोरणे राबवावीत अशा प्रकारची अपेक्षा या निवडणुकीतून प्रामुख्याने सिंहली गटाकडून व्यक्त झाली असून ती अत्यंत धोकादायक आहे. गोताबाया हे आपले बंधू महिंद्रा राजेपक्षेंप्रमाणेच चीनधार्जिणी भूमिका घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताला आगामी काळात अत्यंत सजग आणि सतर्क राहावे लागणार आहे.
श्रीलंकेमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. या निवडणुकांचा निकाल श्रीलंकेच्या राजकारणात असणारे स्पष्ट प्रवाह प्रतिबिंबित करणारा आहे. हा निकाल दोन्ही म्हणजे निवडणुका जिंकलेल्यांसाठीही आणि हारलेल्यांसाठीही धक्कादायक आहे. या निवडणुकांमधून श्रीलंकेतील समाज कशा पद्धतीने बदललेला आहे, तिथले राजकारण कशा पद्धतीने बदलले आहे, याचे स्पष्ट चित्र पुढे येते. गेल्या काही वर्षांमध्ये एकंदरीतच संपूर्ण दक्षिण आशियामध्ये प्रखर राष्ट्रवादाचे संकेत मिळायला सुरूवात झाली आहे. श्रीलंकेतील निवडणुकांनी याची पुष्टी दिली आहे. याचा परिणाम केवळ श्रीलंकेवर होणार नसून दक्षिण आशियातील नेपाळ, भूतान, बांग्लादेश यांसारख्या छोट्या- छोट्या देशांच्या राजकारणावरही होणार आहे. त्यामुळेच या निकालातील प्रवाह स्पष्टपणे जाणून घेणे आणि भारतावर त्याचे काय परिणाम होतील हे समजून घेणे आवश्यक आहे.
श्रीलंकेतील ही निवडणूक दोन प्रतिस्पर्ध्यांमधील आणि ते प्रतिनिधित्व करत असणाऱ्या दोन विचारसरणींमधील निवडणूक होती. त्यातील एक होते साजिथ प्रेमदासा. निवडणुकीपुर्वी 15 दिवस आधी श्रीलंकेत एक युती तयार झाली होती. या न्यू डेमोक्रॅटिक फ्रंट नामक युतीमध्ये युनायटेड नॅशनल पार्टीचे विक्रमसिंघे यांचा पुढाकार होता. ही युती एक प्रकारची बहुवांशिक युती होती. श्रीलंकेतील अल्पसंख्याकांबरोबरच तामिळ आणि मुस्लिम या बहुसंख्याकांचे नेतृत्व करणारे पक्ष या युतीमध्ये होते. दुसरीकडे होते ते गोतावाया राजेपक्षे. यामध्ये गोतावाया यांचा विजय झाला असला तरी या दोन उमेदवारांनी निवडणुकीसाठी कशा प्रकारचा प्रचार केला हे पाहाणे महत्त्वाचे आहे.
निवडणुकीतील प्रचार दोन वेगवेगळ्या विचारप्रवाहांना पुढे घेऊन जाणारा होता. प्रेमदासा यांच्याकडून जो प्रचार केला गेला तो उदारमतवादी लोकशाहीवादी कल्याणकारी राज्याची संकल्पना मांडणार होता. अल्पसंख्याकानाही प्रतिनिधित्व असेल आणि सगळ्यांना मिळून मिसळून घेणारे उदारमतवादी शासन आणि कल्याणकारी राज्य स्थापन करण्याविषयी हा प्रचार केला होता. याउलट दुसरीकडे प्रखर राष्ट्रवादी, अत्यंत कडक शासन, कडक राष्ट्रीय सुरक्षा धोरण, कणखर नेतृत्व आणि कडवे शासन अशा स्वरूपाचा प्रखर उजव्या विचारसरणीचा प्रसार करणारा प्रचार हा राजेपक्षे यांच्याकडून मांडला गेला. विशेष म्हणजे प्रेमदासा यांच्या उदारमतवादी, कल्याणकारी लोकशाहीच्या संकल्पनेला मतदारांनी नाकारल्याचे निकालावरून दिसते आहे. मतदारांनी राजेपक्षे यांच्या प्रखर राष्ट्रवादाला भरभरुन कौल दिला. यावरुन राजेपक्षे यांचे नेतृत्व जनतेने स्वीकारले आहे, असे म्हणता येईल. यामधून श्रीलंकेमधील कोणते प्रवाह समोर येतात ते समजून घेतले पाहिजे.
वांशिक ध्रुवीकरणाचा प्रवाह
श्रीलंकेच्या समाजात, श्रीलंकेच्या राजकारणात कठोर पद्धतीने ध्रुवीकरण झाले आहे. समाजाची विभागणी दोन गटांमध्ये झाली आहे. श्रीलंकेमध्ये सिंहली बुद्धिस्ट लोकांचा गट हा बहुसंख्याक आहे; तर दुसर्या गटात अल्पसंख्यांक मुसलमान आणि तामिळ लोकांचा समावेश आहे. यापैकी सिंहली नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर राजेपक्षे यांना मतदान केले तर मुसलमान आणि तामिळ लोकांचा कौल प्रामुख्याने प्रेमदासा यांना राहिला. श्रीलंकेमध्ये उत्तर आणि पूर्व भागात अल्पसंख्याक मुसलमान आणि तामिळ लोकांची संख्या अधिक आहे. त्याठिकाणी प्रेमदासा यांना प्रचंड मोठे बहुमत मिळाले आहे. या भागातील जनतेने राजेपक्षे यांना नाकारल्याचे स्पष्ट कळते आहे. परंतु देशात उर्वरित भागात मात्र राजेपक्षे यांच्या पारड्यात अधिक मतांचे दान पडल्याने प्रेमदासा यांचा पराभव झाला. यावरून श्रीलंकेतील वांशिक ध्रुवीकरणाची पुरेपूर कल्पना येते.
“इस्लामिक फोबियाचा’ प्रभाव
काही महिन्यांपूर्वी श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोट झाले. हे स्फोट ईस्टर संडेला झाले आणि त्यामध्ये 250 हून अधिक ख्रिश्चन धर्मबांधव ठार झाले. या हल्ल्याची जबाबदारी नंतरच्या काळात इस्लामिक स्टेट आणि तिच्याशी निगडीत श्रीलंकेतील स्थानिक दहशतवादी संघटनांनी घेतली होती. या हल्ल्यानंतर संपूर्ण श्रीलंकेमध्ये मुसलमान अल्पसंख्याकाविषयी अविश्वास आणि संशय निर्माण झाला. यालाच इस्लामिक फोबिया म्हणतो. मुस्लिमांमध्ये अत्यंत टोकाची असुरक्षितता होती. विशेष म्हणजे, श्रीलंकेत होऊ शकणाऱ्या या ईस्टर बॉम्ब हल्ल्याची पूर्वसूचना दिली गेली होती, भारतानेही श्रीलंकेला सजगतेचा इशारा दिला होता. तरीही तिथल्या शासनाने वेळीच दखल न घेतल्याने ते या बॉम्बहल्ल्यापासून देशाला वाचवू शकले नाहीत. अर्थातच हे तिथल्या शासनाचे मोठेच अपयश ठरले.
सिंहली राष्ट्रवादाचा प्रसार
श्रीलंकेमध्ये सिंहली आणि तामिळीयन यांच्यामध्ये सुमारे तीस वर्षे वांशिक संघर्ष होत राहिला. 2009 मध्ये हा संघर्ष संपला. त्यावेळी सिंहली लोकांमध्ये राष्ट्रवाद उफाळून आला होता. तशाच पद्धतीचा राष्ट्रवाद पुन्हा श्रीलंकेमध्ये पुढे आलेला आहे. याला प्रखर उजव्या विचारसरणीचा बहुसंख्याक सिंहलींचा राष्ट्रवाद म्हटले जाते. या राष्ट्रवादानेच राजेपक्षे यांना विजयी केले आहे. गोताबाया राजेपक्षे यांचे बंधू महेंद्रा राजेपक्षे हे मागील काळात श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष होते. श्रीलंकेतील यादवी युद्धाच्या पार्श्वभूमीवरच ते निवडून आलेले होते.
2005 ते 2015 हा त्यांचा कार्यकाळ होता. त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या काळात गोताबाया राजेपक्षे हे श्रीलंकेचे संरक्षण सचिव म्हणून कार्यरत होते. या गोताबाया राजेपक्षे यांनी तामिळीयन लोकांची बंडखोरी अत्यंत हिंसकपणे मोडून काढली. त्यामुळे पुन्हा एकदा गोताबाया राजेपक्षे यांना निवडून देण्यामागे सिंहली लोकांची कठोर मानसिकता स्पष्ट होते. येणाऱ्या काळातही राजेपक्षे यांनी अल्पसंख्याकांच्या विरोधात अत्यंत कडवी धोरणे राबवावीत अशा प्रकारची अपेक्षा या निवडणुकीतून व्यक्त झाली असून ही मानसिकता, अपेक्षा अत्यंत धोकादायक आहे. गोताबाया यांचा राष्ट्रवाद हा अल्पसंख्याकांसाठी कर्दनकाळ ठरू शकतो.
राजेपक्षे यांच्यापुढील आव्हाने
येणाऱ्या काळात गोताबाया राजेपक्षे यांनाही काही आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. त्यांना सिंहली लोकांचा पाठिंबा मिळाला असला तरीही अल्पसंख्याक लोकांचा विश्वास मिळवावा लागेल, त्यासाठी त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यांच्यापुढे मुख्य आव्हान आर्थिक संकटाचे असणार आहे. श्रीलंका हा कर्जाच्या विळख्यात रुतून गेला आहे. या कर्जातून बाहेर येण्यासाठी श्रीलंकेला मोठ्या आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे भारताने राजेपक्षे यांचा विश्वास कसा जिंकता येईल आणि त्यांच्याबरोबर घनिष्ट संबंध प्रस्थापित करून चीनला कसे दूर ठेवता येईल हे पाहाणे गरजेचे आहे.
भारतावर काय परिणाम?
सध्याचे विक्रमसिंघे यांचे उदारमतवादी शासन हे भारतासाठी उपकारक आहे. पण महिंद्रा राजेपक्षे जेव्हा श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष होते तेव्हा त्यांचा ओढा चीनकडे होता. त्यांच्या काळात श्रीलंकेचे चीनशी असणारे संबंध अत्यंत घनिष्ट होते. जणूकाही श्रीलंका ही चीनची वसाहत असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. आता याच राजेपक्षे यांचे बंधू सत्तेत आले आहेत आणि ते त्यांच्यापेक्षाही जास्त कडव्या विचारसरणीचे आहेत. त्यामुळे भारतासाठी ही मोठी डोकेदुखी ठरू शकते. मागील काळात महिंद्रा राजेपक्षे जेव्हा भारत दौऱ्यावर आले होते तेव्हा भारताने स्पष्टपणे श्रीलंकेला चीनपासून दूर रहा असे सांगितले होते. असे असूनही राजेपक्षे चीनला गेले होते. त्यामुळे श्रीलंका पुन्हा चीनकडे ओढला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
डॉ. शैलेंद्र देवळाणकर ,परराष्ट्र धोरण विश्लेषक