कोपरगाव – शहरात मागील काही दिवसांपासून डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे कोपरगाव शहरातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सहकार्याने चेअरमन आशुतोष काळे यांच्या हस्ते कोपरगाव शहरात जंतूनाशक फवारणीचा प्रारंभ करण्यात आला.
यावेळी युवा नेते आशुतोष काळे यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी बोलतांना आशुतोष काळे म्हणाले की, कोपरगाव शहरात काही ठिकाणी गटारी तुंबल्यामुळे डासांचे प्रमाण वाढून नागरिकांना मोठ्या प्रमाणात साथीच्या आजारांची लागण झाली आहे. कोपरगाव शहरातील सर्व दवाखान्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या एक हजारच्या वर जावून पोहोचली आहे.
यामध्ये डेंग्यू सदृश्य रुग्णांचा देखील समावेश असून यामध्ये वाढ होऊ नये. पावसामुळे साचलेल्या पाण्यात डास वाढून कोपरगाव शहरात रोगराई पसरू नये व कोपरगाव शहरातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी आपण आजवर प्रयत्न केलेला आहे. डासांमुळे डेंग्यू, मलेरिया आदी साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून शहरातील सर्व प्रभागात डास प्रतिबंधक जंतूनाशक फवारणी करण्यात येणार असल्याचे असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी कोपरगाव शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष, नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.