आळंदी, – तीर्थक्षेत्र आळंदी येथे आज (दि. 5) सकाळी ग्रामस्थांनी आळंदी देवस्थानच्या विश्वस्तपदी स्थानिकांना डावलल्याप्रकरणी दुपारपर्यंत बंद पाळला. यावेळी ग्रामस्थांनी चाकण चौक येथून प्रदक्षिणामार्गे निषेध मोर्चा काढून माऊली महाद्वारात समारोप सभा घेतली. यावेळी मोर्चादरम्यान, स्थानिकांना डावलल्याने आणि प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. यावेळी प्रदक्षिणा मार्गासह परिसरातील दुकानदारांनी उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेऊन मोर्चाला पाठिंबा दर्शवला. यावेळी आळंदीकर ग्रामस्थ तसेच आळंदी येथील वारकरी सांप्रदायातील मंडळीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सातत्याने आळंदीकरांना डावलल्याने रोष –
श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीत एकूण 6 विश्वस्त संख्या आहे. 7 वर्षांसाठी विश्वस्त नियुक्ती केली जाते. यासाठी अर्ज प्रक्रिया नंतर मुलाखती होऊन पुणे जिल्हा न्यायालयाकडून नियुक्ती केली जाते. मात्र आळंदी ग्रामस्थ तसेच वारकरी सांप्रदायातील कीर्तनकार मंडळींना जाणीवपूर्वक डावलले जात असल्याचा आरोप यावेळी उपस्थित मोर्चेकऱ्यांनी माऊली महाद्वारासमोर झालेल्या निषेध मोर्चाच्या समारोप सभेत केला.
पोलिस बंदोबस्तात मोर्चा –
आज (दि. 5) संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकी वारी सोहळ्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आळंदीत पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मोर्चादरम्यान, काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.
लिंक वर क्लिक करून पहा व्हिडीओ – https://fb.watch/oKUd-hEqnA/
दुपारनंतर बंद शिथील –
आळंदीला राज्यभरातून वारकरी भाविक येत आहेत. त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही तसेच व्यावसायिकांना फटका बसू नये याची मोर्चेकऱ्यांनी काळजी घेतली. काही तास दुकाने बंद ठेवून मोर्चा समारोपानंतर दुकाने उघडण्याचे आवाहन मोर्चेकऱ्यांनी केले. दुपारनंतर दुकाने सुरु झाली होती.