आळंदी, – श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकी एकादशी यात्रा सोहळा मंगळवारी (दि. 5) पासून सुरु होत आहे. शनिवार (दि. 9) कार्तिकी एकादशी तर सोमवार (दि. 11) संजीवन समाधी सोहळा आहे. अशातच संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीत विश्वस्त म्हणून स्थानिकांनाही स्थान मिळावे यासाठी आळंदीकर ग्रामस्थांनी बैठक घेऊन मंगळवार (दि. 5) रोजी आळंदी बंद पुकारला आहे.
बैठकीनंतर ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी देवस्थानच्या विश्वस्तपदी स्थानिकांची निवड करण्यात यावी यासाठी संबंधित प्रशासनाकडे पत्र व्यवहार करण्यात आला होता. तरी देखील संबंधित प्रशासनाने स्थानिकांचा विचार न करता आळंदी देवस्थानवर तत्कालीन विश्वस्तांच्या शिफारशी वर नवीन तीन विश्वस्तांची नेमणुक केली आहे. तसेच तत्कालीन विश्वस्तांना सुध्दा मार्च महिन्यापर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे. याबाबत समस्त आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीने या गोष्टीचा तीव्र निषेध करण्यात आला असून प्रशासनाने याकडे योग्य लक्ष न दिल्यास कार्तिकी वारीत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी आळंदी ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी बहुसंख्येने आळंदीकर ग्रामस्थ उपस्थित होते.
संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीत 6 विश्वस्त –
बैठकीतील माहितीनुसार, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीत 6 विश्वस्तांची 7 वर्षांसाठी पुणे जिल्हा न्यायालय न्यायाधिशांकडून नेमणूक केली जाते. आधीच्या विश्वस्तांचा कार्यकाळ संपल्यामुळे नविन तीन विश्वस्तांची नियुक्ती तर तीन विश्वस्तांना मार्च 2024पर्यंत मुदतवाढ दिली आहे. 20 नोव्हेंबर 2023 रोजी पुणे जिल्हा न्यायालयाने डाॅ. भावार्थ देखणे, अॅड. राजेंद्र उमाप, योगी निरंजननाथ अशा तीन नवीन विश्वस्तांची नियुक्ती केली आहे. तर अजून तीन विश्वस्त नियुक्ती होणार आहेत. पहिल्या टप्प्यात झालेल्या 3 विश्वस्त नियुक्तींमध्ये आळंदीकर ग्रामस्थांचा समावेश केलेला नाही. आळंदीतून विश्वस्त पदासाठी 10 हून अधिक अर्ज पाठिवण्यात आले आहेत. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील विश्वस्त नियुक्तीदरम्यान, स्थानिकांना प्राधान्य द्यावे, अशी आळंदीकर ग्रामस्थांची मागणी आहे. आतापर्यंत एकदाही विश्वस्त म्हणून आळंदीकर ग्रामस्थांची माऊली संस्थान कमिटीत विश्वस्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली नाही.