इंफाळ – मणिपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सीबीआयकडून तपासाला गती देण्यात आली आहे. तसेच आरोपींच्या अटकेची प्रक्रिया देखील सुरु करण्यात आली आहे. या प्रकरणात सीबीआयने आतापर्यंत सहा तक्रारी नोंदवल्या आहेत. तर दहा जणांना आतापर्यंत सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वेगवेगळ्या ठिकाणाहून लोकांना अटक करण्यात आली आहे. तसेच महिलांची विवस्त्र धिंड काढल्याच्या प्रकणात देखील सीबीआयकडून तक्रार नोंदवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
शुक्रवार (28 जुलै) रोजी या प्रकणावर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार होती. त्याच पार्श्वभूमीवर गुरुवारी (27 जुलै) रोजी केंद्राने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र देखील सादर केले होते. त्या प्रतिज्ञापत्रात या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच सर्वोच्च न्यायालयाने ही संपूर्ण प्रक्रिया सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश द्यावेत असे देखील केंद्र सरकारने या प्रतिज्ञापत्रात म्हटले होते.
दरम्यान महिलांची विवस्त्र धिंड काढल्याप्रकरणी मणिपूरमध्ये सीबीआयचा तपासा सुरु करण्यात आल्याचे केंद्र सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आले आहे. मात्र, व्हायरल व्हिडिओ प्रकरणाचा तपास सीबीआयने औपचारिकपणे हाती घेतलेला नाही. तर या प्रकणात मणिपूर पोलिसांनी व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या एकूण आठ जणांना अटक केली आहे. दरम्यान गृह मंत्रालयाने सचिव अजय कुमार भल्ला यांच्यामार्फत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात मणिपूर प्रकरणातील ट्रायल रन ही मणिपूर बाहेर करण्यात यावी, अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली आहे.