वेगवान वाहतुकीबरोबरच इंधन बचत करण्याचा शासनाचा प्रयत्न
पुणे – महामार्ग विकास प्राधिकरणाने “फास्ट टॅग’ लोकप्रिय करण्यासाठी सध्या मोहीम सुरू केली आहे. याला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत आहे. प्राधिकरण आता राष्ट्रीय महामार्गावरील स्पीड ब्रेकर काढून टाकण्याचे काम हाती घेणार आहे. यामुळे वाहतूक वेगवान, सुरळीत होण्याबरोबरच इंधनाची बचत होण्यासही मदत होईल, असे प्राधिकरणाला वाटते. विशेषत: टोल प्लाझावरील स्पीडब्रेकर काढून टाकण्यास प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरळीत आणि वेगात वाहतुकीसाठी महामार्गावरील विशेष: टोल नाक्यावरील स्पीड ब्रेकर काढण्यात येतील. फास्टॅगची अंमलबजावणी सुरू झाली असल्यामुळे टोल प्लाझाजवळील स्पीड ब्रेकर आणि रंबल स्ट्रिप्स असण्याची गरज उरलेली नाही.
विविध रस्ते विविध गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आले असतात. काही ठिकाणी वाहतुकीचा वेग मंद ठेवण्याची गरज असते. त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर लावले जातात. मात्र, मुळातच महामार्ग हे वेगवान वाहतुकीसाठी तयार केलेले आहेत. त्यामुळे महामार्गावर असलेले अडथळे दूर करण्यात येणार आहेत. स्पीड ब्रेकरमुळे वाहनाला थांबावे लागते. त्यामुळे वाहनांचे नुकसान होते. त्यातील प्रवाशांना त्रास होतो. वाहनाचा वेग कमी करने आणि पुन्हा वाढविणे यामुळे अधिक इंधन लागते. आता नव्या उपक्रमामुळे प्रवाशांचा वेळ, पैसे वाचतील. वाहतूक सुरळीत होईल. विशेषतः ऍम्ब्युलन्समधील रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांना महामार्गावरील वाहतूक प्रवासावेळी त्रास कमी होईल, असे त्यांनी सांगितले.
…तर बऱ्याच प्रमाणात इंधनाची बचत होणार
आपल्या गरजेच्या 80 टक्के इंधन भारत आयात करतो. ही वाहतूक सुरळीत व वेगवान झाली तर, बऱ्याच प्रमाणात इंधनाची बचत होऊ शकते, असाही तर्क अधिकाऱ्यांनी मांडला. इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन म्हणजे “फास्ट टॅग’मुळे सकारात्मक परिणाम देशातील महामार्गावर आढळून येत असल्याचे त्यांनी सांगितले.