अमृता साठे, संगीत विशारद
जुन्या संगीत नाटकांमधून कीर्ती शिलेदार यांनी केलेल्या भूमिका बऱ्याच लोकप्रिय झाल्या. रुक्मिणी, सुभद्रा, मंथरा, द्रौपदी, वसंतसेना अशा अनेक भूमिका त्यांनी साकारल्या. संगीत नाटकांत आवश्यक असणारी लय त्यांच्या गायकीत होती. स्वरांप्रमाणेच त्यांनी तालावरही प्रभुत्व मिळविले होते.
संगीत रंगभूमीची देदीप्यमान परंपरा हा महाराष्ट्राचा एक अनमोल असा सांस्कृतिक दागिना आहे. या दागिन्यातील दोन रत्ने एका पाठोपाठ एक निखळणे हा मराठी रंगभूमीवरील मोठा आघात आहे. काही दिवसांपूर्वीच गायक-अभिनेते रामदास कामत यांनी या जगाचा निरोप घेतला आणि त्या पाठोपाठ गायिका-अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांनी शनिवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या दहाव्या वर्षी रंगभूमीवर पहिलं पाऊल ठेवणाऱ्या कीर्ती शिलेदार यांनी गेली साठ वर्षे रंगभूमीची अविरत सेवा केली. 2018 मध्ये झालेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. सध्याच्या काळातही संगीत नाटकाची परंपरा सुरू ठेवण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली, त्यात कीर्ती शिलेदार यांचे नाव अग्रस्थानी घ्यावे लागेल.
जयराम आणि जयमाला शिलेदार या संगीत नाटकातील कलावंत दाम्पत्याच्या पोटी कीर्ती शिलेदार यांचा जन्म झाला, त्यामुळे संगीत आणि अभिनयाचे संस्कार त्यांच्यावर अगदी बालवयातच झाले. “संगीत सौभद्र’ नाटकात वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी त्यांनी अभिनय केला. विशेष म्हणजे त्यांनी नारदाची भूमिका करून रसिकांना मोहिनी घातली होती. संगीत आणि अभिनयाच्या दुनियेत अशा प्रकारे बालवयातच पदार्पण केले असले तरी शिक्षणाकडे दुर्लक्ष न करता त्या पदवीधर झाल्या. संगीत स्वरसम्राज्ञी या नाटकातील त्यांची पदे खूप गाजली. विशेषतः वेगळ्या शैलीतील “कशी केलीस माझी दैना’ हे पद आजही रसिक गुणगुणतात. दृवरसम्राज्ञी हे नाटक विद्याधर गोखले यांनी लिहिले होते आणि त्या नाटकाच्या निमित्तानेच नीळकंठराव अभ्यंकर हे कीर्ती शिलेदार यांना भेटले. अभ्यंकर यांना त्यांनी गुरुस्थानी मानले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत आणि ठुमरी या प्रकारांत त्या पारंगत झाल्या.
जुन्या संगीत नाटकांमधून कीर्ती शिलेदार यांनी केलेल्या भूमिका बऱ्याच लोकप्रिय झाल्या. रुक्मिणी, सुभद्रा, मंथरा, द्रौपदी, वसंतसेना अशा अनेक भूमिका त्यांनी साकारल्या. संगीत नाटकात आवश्यक असणारी लय त्यांच्या गायकीत होती. स्वरांप्रमाणेच त्यांनी तालावरही प्रभुत्व मिळविले होते. तबला आणि मृदंग वादनात त्यांनी नैपुण्य प्राप्त केले होते. संगीत नाटकांमधून त्यांनी भूमिका तर केल्याच; पण त्यांच्या ज्येष्ठ भगिनी दीप्ती भोगले म्हणजेच लता शिलेदार यांच्या दोन नाटकांचे संगीत दिग्दर्शनही त्यांनी केले होते. पारंपरिक संगीत नाटक आणि आधुनिक काळ यांची सांगड घालून त्यांनी केलेले हे संगीत गाजले. त्यातील एका नाटकाला सर्वोत्कृष्ट संगीताचा पुरस्कारही मिळाला होता. या नाटकाचे नाव “चंद्रमाधवी’ असे असून, त्यात कीर्ती शिलेदार यांनी केलेली मैना ही भूमिकाही खूप गाजली.
संगीताचा आणि त्यांचा संबंध केवळ गायकी किंवा नाटकापुरता मर्यादित नव्हता तर संगीतात शब्दांना खूप महत्त्व असते हे जाणून त्यांनी शब्दार्थ आणि काव्यार्थ यांची माहिती देणारा शोधनिबंधही लिहिला. राष्ट्रीय नाट्यशाळेच्या (एनएसडी) “एकच प्याला’ उपक्रमात त्यांनी सहभाग घेतला. हिंदीत भाषांतरित केलेली नाट्यपदे एनएसडीच्या विद्यार्थ्यांकडून गाऊन घेतली. शारदा या संगीत नाटकाचा हिंदी नाट्यांश त्यांनी सादरही केला होता. बालगंधर्व पुरस्कार, नाट्यव्रती पुरस्कार, अण्णासाहेब किर्लोस्कर जीवनगौरव पुरस्कार असे मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले. कीर्ती शिलेदार यांच्या मातोश्री जयमाला शिलेदार यांनी असे लिहिले आहे की, “”कीर्ती पोटात असतानाच मला सुभद्रेची भूमिका करावी लागली.
त्यामुळे जन्मापूर्वीच तिचे रंगभूमीशी नाते जोडले गेले. कीर्तीच्या जन्मानंतर तिला रंगपटात ठेवून आम्ही प्रयोग सादर करीत होतो. त्यावेळच्या कंपन्या एखाद्या गावात मुक्कामाला राहिल्या की महिना-महिना राहत असत. त्यावेळी “बाजीराव मस्तानी’ हे कंपनीचे नाटक सुरू होते. कीर्ती खूपच लहान होती. नाटकात ठासून भरलेल्या दारूवर हातोडा मारून तोफेचा आवाज काढला जात असे. त्या आवाजाने छोटी कीर्ती दचकत असे; परंतु काही दिवसांनी नवलच पाहायला मिळाले. दारूचा आवाज होण्यापूर्वीच कीर्तीचे हात कानावर जाऊ लागले. अगदी छोट्या वयात तिला हे कसे समजले, याचेच आम्हाला आश्चर्य वाटले.” यावरून रंगभूमीशी कीर्ती शिलेदार यांचा संबंध किती लवकर जोडला गेला, हे समजते. लता आणि कीर्ती यांच्यासह शिलेदार यांच्या घरातील सगळीच मुले तबलजीच्या शेजारी बसून सगळी नाटके पाहत असत. घरी आल्यावर ही मुले नाटकात कोण, कुठे चुकले याची नक्कल करून दाखवीत असत. कीर्ती शिलेदार या तर लहानपणी नकला आणि विडंबन करण्यात सगळ्यात पुढे असायच्या.
कीर्ती शिलेदार यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा स्वर. गायिकांचा स्वर सामान्यतः काळी चार किंवा आसपास असतो. परंतु मुळातच टिपेचा आवाज असणाऱ्या कीर्ती शिलेदार यांचा स्वर पुरुष कलावंतांप्रमाणे काळी एक हा होता. त्या लहान असतानाच “राम जोशी’ हे नाटक जयराम आणि जयमाला शिलेदार यांच्या कंपनीकडून सादर केले जात असे. त्यात विंगेतून एक झील म्हटली जात असे. ती खूप उंच स्वरात असायची आणि कीर्ती शिलेदार ही झील म्हणायला सगळ्यात पुढे असत. टीपेच्या स्वराची ही देणगी त्यांच्या गायकीला एक वेगळीच ओळख देणारी ठरली. काळी चार हा स्वर कीर्ती शिलेदार यांना “कमी’ लागतो, हे लक्षात आल्यावर जयमाला शिलेदार यांनी काळी पाच हा स्वर लावायला लावला. तोही कमी पडू लागल्यावर काळी एकमध्ये पद म्हणण्यास कीर्ती यांना सांगितले आणि “मूर्तिमंत भीती उभी’ हे नाट्यपद त्यांनी काळी एकमध्ये गाऊन दाखविले.
त्यांच्या गायकीची सुरुवात होण्याची कहाणीही रंजक आहे. लहानपणी त्यांना रेडिओ ऐकण्याचा छंद होता. कर्नाटक संगीत त्या नेहमी ऐकत असत आणि त्याची नक्कल करीत असत. त्या नकलेतूनच कीर्ती शिलेदार यांची तान तयार झाली, असे जयमाला शिलेदार म्हणतात.
“कशी केलीस माझी दैना’ गाणे ऐकताना याचा प्रत्यय येतो. कर्नाटक संगीताची त्यांना आवड होती आणि या संगीताच्या मैफलींनाही त्या हजेरी लावत असत. संगीत नाटक हा देदीप्यमान असला तरी इतिहास आहे, असे मानण्याच्या काळात कीर्ती शिलेदार यांनी संगीत नाटकाला उभारी देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. या कर्तृत्वामुळे त्यांचे नाव संगीत आणि नाट्यरसिकांच्या कायम स्मरणात राहील, यात शंकाच नाही.