– डॉ. अशोक लिंबेकर
23 एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तकदिन म्हणून साजरा केला जातो. काही लोक वाचनाकडे वळतील ही भाबडी आशा बाळगून का होईना, या दिवसाचे औचित्य मानण्यास हरकत नाही.
वाचनाचे महत्त्व केवळ पुस्तकदिन अथवा वाचन प्रेरणादिनाच्या निमित्ताने सांगणे आणि त्या दिवशीच वाचनाविषयी ममत्व वाटणे हे कोणत्याही सुसंस्कृत, प्रगत समाजाचे खचितच लक्षण नाही.तरीही या निमित्ताने का होईना वाचनाचे महत्त्व पृष्ठस्तरावर येते. आजची पिढी वाचत नाही अशी एक सार्वत्रिक ओरड नेहमी केली जाते. वाचनावर प्रेम करणारी मंडळी तर ती करतातच; परंतु वाचनाच्या आसपास न फिरकणारीही यात सामील असतात हे विशेष. वाचनसंस्कृती टिकून राहणे अथवा ती जोपासणे ही एक सामाजिक गरज आहे; परंतु आजच्या समाजाचे प्राधान्यक्रम पाहता ही निकड अगदी तळाशी आहे. हे वास्तव लक्षात घेता समाजजीवनात पुस्तकांचे महत्त्व कसे रुजणार? हा एक सांस्कृतिक प्रश्न आहे. असे प्रश्न आताच निर्माण झालेत असेही नाही.
खानोलकरांनी सत्तरच्या दशकात हाच प्रश्न त्यांच्या ललित लेखातून खूप मार्मिकपणे मांडला होता. एक ग्रामीण माणूस मुंबईत येतो. इथे आल्यावर केवळ समुद्रच न पाहता जहांगीर कलादालन पहावे, जेजे स्कूल ऑफ आर्ट पाहावे असे त्याला वाटते. तो बिचारा या स्थळांचा पत्ता अनेक महाराष्ट्रीय माणसांना विचारतो; परंतु त्याची हेटाळणी करून वरून त्याला ‘मुंबईत व्यवस्थित पत्ता असल्याशिवाय नेमक्या स्थळी पोहचता येत नाही’ मदतीऐवजी असे आगाऊ सल्ले मिळतात. अचानक त्याला एक गोरा माणूस दिसतो. तो अमेरिकन असतो. त्याला हा पत्ता विचारतो.आणि काय आश्चर्य तो माणूस म्हणतो, ‘‘मी तिकडेच चाललो आहे. चला मी तुम्हाला तिथे सोडतो. भारतात आलो की मी या स्थळांना भेटी देतोच.’’ आपल्या सांस्कृतिक अनास्थेचे हे उदाहरण. आजही यात फारसा फरक पडला नाही.
वाचनसंस्कृती लोप पावते आहे हे एक अर्धसत्य आहे. आज वाचन संस्कृती बद्दल जे निराशेचे, उदासीनतेचे सूर ऐकू येतात त्याला सांस्कृतिक व्यवहारातील अनेक घटक कारणीभूत आहेत. यावर उपाय म्हणून काही सकारात्मक प्रयत्न नक्कीच होत आहेत. साधारणतः नव्वदच्या उंबरठ्यावरच विविध माध्यमांचे आव्हान आणि त्यातून ग्रंथ संस्कृतीवर होणार्या संक्रमणाची चाहूल लागलेली होती. आजही अनेक प्रकाशन संस्था वाचकांनी पुस्तकाकडे आकर्षित व्हावे म्हणून अनेकविध प्रयोग राबवत आहेत; परंतु ठराविक पातळीच्या पलीकडे त्याचा विस्तार होताना दिसत नाही. पुस्तकं ही जीवनावश्यक वस्तूंच्या जागी यायला हवीत, अशी चर्चा आणि मागणी आज काही प्रकाशक आणि ग्रंथ विक्रेते विविध माध्यमातून करताना दिसत आहेत. परंतु सामाजिक पाठिंब्याशिवाय आणि जगण्याच्या किमान गरजा भागल्याशिवाय सर्वस्तरावर या अपेक्षांची पूर्ती होणे शक्य नाही. कारण वाचन ही आज केवळ व्यक्तिगत बाब झालेली आहे. ती सामाजिक गरज बनल्याशिवाय या अपेक्षा वास्तवात साकार होऊ शकणार नाहीत.
1970च्या दशकात टेलिव्हिजनचा आपल्या सांस्कृतिक जीवनात प्रवेश झाला. त्यानंतर या छोट्या पडद्याने आपले भावजीवन व्यापून टाकले. त्याआधीही चित्रपट माध्यमाने नाटक आणि लोकनाट्य यासारख्या जिवंत समूहजीवी कलांना झाकोळून टाकले होते. यात नाटक कसेतरी तग धरून उभे राहिले; परंतु मराठी मातीतील लोकनाट्य ही अस्सल कला मात्र पुन्हा तितक्या ताकदीने उभी राहू शकली नाही. नव्वद नंतरच्या माध्यम क्रांतीने हीच परिस्थिती ग्रंथ जगतात निर्माण केली. या माध्यम क्रांतीने अवघ्या विश्वालाच कवेत घेतले. माणूस माध्यम केंद्री बनला. जगाच्या कुठल्याही कोपर्यातील बातमी, माहिती आपल्यापर्यंत क्षणार्धात येऊन धडकू लागली. ‘करलो दुनिया मुठ्ठीमे’ अशा एका क्लिकवर सर्व काही उपलब्ध होऊ लागले. पुस्तक वाचल्याशिवाय काही बाबी अवगत होऊ लागल्या, पुस्तके हीच जेव्हा माहितीचे प्राथमिक स्रोत होते तेव्हा त्यावर विसंबून राहणे गरजेचे होते. आता ही निकड सामान्य वाचकांना राहिली नाही.
नवमाध्यमे या काळात अधिक विस्तारत ती अधिक समाजाभिमुख झाली. माध्यमांची ही गतिमानता आणि जागतिकीकरणाच्या रेट्याने माणूस माध्यम केंद्री बनला. यात माहिती आणि ज्ञान यांचे भान सुटत गेले. यात वाचन मागे पडत गेले. मागील दशकात हे वाचन वर्तमानपत्राच्या रविवार पुरवणीपुरतेच मर्यादित होते. आता तर ते समाजमाध्यमापुरतेच सीमित झालेय. माध्यमं केंद्री समाज या कोशातच गुरफटला गेला. मूळ संदर्भ न पाहता, कोणतीही खातरजमा न करता वरवरच्या महितीलाच हा समाज ज्ञान समजू लागला. यातून ‘अभ्यासोनी प्रकटावे’ या वृत्तीचा र्हास होऊन प्रतिक्रियावाद वाढत गेला. या समाजवास्तवाची प्रचिती शिक्षणापासून ते राजकारणापर्यंत येताना दिसते. या समाज वास्तवाचा अत्यंत गंभीर परिणाम वाचन संस्कृतीवर झाला. असे असले तरी काही पुस्तकांच्या लाखो प्रती आज विकल्या जात आहेत. ईबुक्स, कींडल, वेब पोर्टल यासारख्या नव्या माध्यमात, नव्या डिजिटल रुपात पुस्तके आपणास भेटत आहेत.
यावरून एक गोष्ट सहज ध्यानात येते ती म्हणजे एक व्यक्तिगत छंद म्हणून वाचन ही बाब आज जोपासली जातेय. पुढील काळातही वाचनाचे स्वरूप असेच रहाणार आहे. तसेच जे सकस आहे ते वाचले जाणारच आहे याचेही हे द्योतकच म्हणावे लागेल. नव्या तंत्रज्ञानामुळे पुस्तक प्रकाशित करणे सहज सोपे झालेय. त्यामुळे अनेक पुस्तके प्रकाशित होत आहेत. याला अनेक व्यावसायिक, व्यावहारिक कारणेही आहेत. ही संख्यात्मक वृद्धी दिसत असली तरी गुणात्मक वाढ समजण्यास मात्र संदेह आहे. वाचणारा जो सजग वाचक आहे, त्याला निवडण्याचे भान आहे त्यामुळे आजही सकस साहित्य वाचले जाते. परंतु हे चित्र अतिशय मर्यादित आहे.
दर्जेदार साहित्य ते ललित असो अथवा वैचारिक, त्याची चर्चा व्हायला हवी. परंतु अशी चर्चा करणारा, उत्तमाची पारख करून दर्जेदार साहित्य वाचकाभिमुख करणार्या साक्षेपी समीक्षकांची दुर्मिळता हाही आजचा कळीचा प्रश्न आहे. अजूनही तरुण वाचक ग्रंथ जगताच्या परिघावरच आहे. समाज माध्यमांच्या मगरमिठीतून तरुणाईला पुस्तकाकडे वळवल्या शिवाय हे घडणे शक्य नाही. यासाठी व्यापक लोकचळवळ उभारणे गरजेचे आहे. तरुणांचे भावविश्व, त्यांचे जगणे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या आशाआकांक्षा यापासून आजचे साहित्य कोसो मजले दूर आहे. याला काही सन्माननीय अपवाद असतीलही; परंतु ते खूप कमीच. अर्थात, कितीही माध्यमे आली तरी पुस्तकांची जागा ही माध्यमे घेऊ शकणार नाहीत; कारण आपले व्यक्तिगत छंद आणि अभ्यास म्हणून पुस्तके हीच सर्वश्रेष्ठ आणि सशक्त माध्यम आहे आणि ते राहीलच यात कोणताही संदेह नाही.