20 ठराव मंजूर : संमेलनाध्यक्षांनी जेएनयूबद्दल घेतलेल्या भूमिकेवर ठराव नाहीच
उस्मानाबाद : गोरोबाकाकांच्या भूमित 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप झाला. संमेलनाच्या शेवटच्या दिवशी विविध 20 ठराव मांडण्यात आले.
यातील काही ठरावांना एकमताने अनुमोदन दिल्याचे पाहायला मिळाले.
या ठरावांमध्ये साहित्य संमेलन मंडळाने अनेक महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. सीमा भागातील नागरिकांच्या मागण्या त्वरीत मान्य झाल्या पाहिजेत, यासाठी मंडळ आग्रही असल्याचे दिसून आले.
याशिवाय शेती, मराठी भाषा याविषयी देखील ठराव मांडण्यात आला. मात्र, अपेक्षेप्रमाणे महामंडळाने साहित्य संमेलनामध्ये अध्यक्षांनी सुचवलेल्या एकाही मुद्द्याला अनुलक्षून ठराव घेतला नाही.
यावेळी कुठलीही उघड भूमिका न घेता वादाचे विषय पूर्णपणे टाळण्यात आले. संमेलनाध्यक्षांनी जेएनयुबद्दल घेतलेल्या परखड भूमिकेवर देखील एकही ठराव मांडण्यात आला नाही. संमेलनाची सांगता करताना मागील काळात ज्या थोर व्यक्तींचे निधन झाले त्यांना आदरांजली देण्यात आली.
विशेष म्हणजे संमेलनाची सांगता करताना संयोजकांनी संमेलनात गोंधळ घालणाऱ्या जगन्नाथ पाटील यांचा साहित्य समितीतर्फे संपादक म्हणून काम केल्याने सत्कार केला. या अखेरच्या दिवशी साहित्य संमेलनाने अनेक महत्त्वाच्या विषयांवर 20 ठराव मंजूर केले आहेत
दरम्यान, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन रानकवी ना. धों. महानोर यांच्या हस्ते झाले होते. संमेलनाच्या उद्घाटनाला जाऊ नका, अशा धमकीला भीक न घालता महानोर यांनी संमेलनाचे उद्घाटन केले होते. तर संमेलनाचे अध्यक्षपद फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी भूषवले.