* जुन्नर तालुक्यात काढणी अंतिम टप्प्यात
* येलो मॉझेक आणि पावसाची अनियमितता कारणीभूत
* उत्पादन खर्चही निघेना
बेल्हे – सोयाबीनची माती करणारे धोरण केंद्र सरकारने हाताशी धरले आहे. देशात मागच्या दोन वर्षांपासून पामतेल आयातीचा ओघ सुरूच आहे त्याचा फटका सोयाबीन उत्पादकांना बसतोय. ऐन आवकेच्या हंगामात हमीभावाच्या खाली सोयाबीनचे भाव आलेत. त्यातून उत्पादन खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च आणि मिळणाऱ्या भावाच गणित जुळत नाही. त्यातच वातावरणातील बदलामुळे हाती केवळ अर्धेच उत्पादन हाती आल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
जुन्नरचे कृषी अधिकारी गणेश भोसले म्हणाले की, यंदा जुन्नर तालुक्यात 13 हजार 217 हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी करण्यात आली असून शेंगा भरणीच्या वेळी पाऊस नसल्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात घट झाली असून एकूण घट आणखी आठ ते दहा दिवसांत हाती येण्याचा अंदाज असल्याचे त्यांनी नमूद केले. जुन्नर तालुक्यात सोयाबीन काढणी अंतिम टप्प्यात आली आहे.
आधीच पावसाच्या खंडामुळे उत्पादकता घटली आहे. त्यात येलो मॉझेक या रोगाने सोयाबीनचे अर्धे नुकसान केल. एकरी आठ ते नऊ क्विंटल सोयाबीन उत्पादन अपेक्षित होते पण चार ते पाच क्विंटलचा उतारा हाती आला. या बाजार भावात सोयाबीनचा उत्पादन खर्च पण निघत नाही. रब्बीच्या पेरणीसाठी तर उसनवारी केल्याशिवाय पर्याय नाही. अशी माहिती शेतकरी शिवाजी दाते यांनी दिली.
सोयाबीन उत्पादक शेतकरी हैराण झालेत. विविध भागातील शेतकऱ्यांची पोर रस्त्यावर उतरलेत स्थानिक नेत्यांना निवेदन देत आहेत. हे चित्र आशावादी आहे सरकार निवडणुकांसाठी शेतमालाचे भाव पाडायला लागलय. आता शेतकऱ्यांना लोकप्रतिनिधीला प्रश्न विचारावे लागतील. अन्यथा असाच मातीमोल बाजारभाव मिळत राहिला तर शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही.
– ज्ञानेश्वर संभेराव, सोयाबीन उत्पादक शेतकरी, अणे
सोयाबीनचा एकरी खर्च 25 हजार 500 रुपये येतो. जर एकरी पाच क्विंटल सोयाबीनचे उत्पादन हाती आले तर सध्याच्या 4 हजार 500 रुपये क्विंटल बाजार भावाप्रमाणे शेतकऱ्याच्या हातात 22 हजार 500 रुपये पडतात म्हणजे भांडवल पण पदरमोड करून घालावे लागते.
– संतोष आंग्रे, सोयाबीन उत्पादक, गुळंचवाडी.