पिंपरी -एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणासाठी गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेला संप आता संपुष्टात येत आहे. संपावर असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हावे असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे वल्लभनगर आगारातील सर्वच कर्मचारी 22 एप्रिलपूर्वी कामावर हजर होणार आहेत. तर रविवार (दि.17) पर्यंत 32 कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत.
वल्लभनगर आगारातील 192 कर्मचाऱ्यांपैकी 32 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. तर उर्वरित 160 कर्मचारी देखील येत्या शुक्रवार (दि. 22) पर्यंत कामावर हजर होणार असल्याचे एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने कर्मचारी ओमप्रकाश गिरी यांनी सांगितले. त्यामुळे गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेला एसटीचा संप संपणार आहे. तसेच शुक्रवारपासून वल्लभनगर आगारामध्ये पुन्हा पूर्वीप्रमाणे सुरळीत बससेवा सुरू होणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
कर्मचारी केले होते बडतर्फ
दरम्यान, वल्लभनगर आगारातील 192 कर्मचाऱ्यांपैकी 26 कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले होते. त्यांच्यावर केलेली कारवाई न्यायालयाच्या आदेशानुसार मागे घेण्यात आली आहे. त्यामुळे ते कर्मचारीही कामावर रुजू
होणार आहेत.
हळूहळू एसटी पूर्वपदावर
सद्यस्थितीत वल्लभनगर आगारातून लांबपल्याच्या सोलापूर, उमरगा, लातूर या तीन बस सुरू झाल्या आहेत. तर जवळच्या 10 बसच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. आगारामध्ये रात्रीच्या मुक्कामासाठी 35 ते 40 बस येत आहेत. जस-जसे कर्मचारी कामावर येतील तशी बसच्या संख्येत वाढ होणार असल्याचे वल्लभनगर आगारातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याबाबत आदेश दिले आहेत. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होणे बंधनकारक आहे. अन्यथा तो न्यायालयाचा अवमान ठरेल. त्यामुळे येत्या शुक्रवारपर्यंत आम्ही सर्व 160 कर्मचारी कामावर रुजू होणार आहे.
– ओमप्रकाश गिरी, कर्मचारी, वल्लभनगर आगार.