पुणे – केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेमध्ये एकूण 761 उमेदवार उत्तीर्ण झाले असून देशात पहिला क्रमांक बिहारच्या शुभम कुमारने मिळविला आहे. महाराष्ट्राचा मुलगा अल्ताफ महंमद शेख याने देखील यूपीएससी परीक्षेत बाजी मारली आहे. यूपीएससी परीक्षेत त्यांनी ५४५ वा क्रमांक मिळवत आयपीएस पदासाठी पात्र झाले आहेत.
सन 2020 मध्ये यूपीएससीकडून परीक्षा घेण्यात आली होती. हा निकाल वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. नियमाप्रमाणे वेबसाइटवर आता फक्त निकाल पाहता येणार असून सविस्तर गुणपत्रक 15 दिवसांत अपलोड करण्यात येणार आहे.
या परीक्षेसाठी अल्ताफ महंमद शेख याने २०१५ सालापासून प्रयन्त सुरु केले. त्याने २०१५ साली युपीएसची परीक्षा पास करत केंद्रीय गृह खात्यात डीवायएसपी पदावर रुजू झाले. पुढे थेट आयपीएस पदापर्यंत धडक मारल्याने शेख यांची यशोगाथा कौतुकास्पद ठरत आहे. त्यांनी वयाच्या २२ व्या वर्षी पहिल्यांदा यूपीएससीची परीक्षा पास झाले. त्यानंतर नोकरी करत आता पुन्हा एकदा आयपीएससाठी त्यांची निवड झाली आहे.
शेख हे एका सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. त्यांचे मूळ गाव पुणेतील बारामती तालुक्यातील काटेवाडी आहे. शालेय काळात शिक्षण घेण्यासाठी त्यांनी भजी व चहा विक्रीचे कामही केले होते. मेहनत आणि जिद्दीने त्यांनी आयपीएस पद मिळवले आहे. त्यांचा या मेहनतीचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.