समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आज जन्मदिवस. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा.
जात-पात, धर्म-पंथाचे अडथळे दूर करून ज्ञानाचा दिवा घराघरांत प्रज्वलित करणारे, स्वातंत्र्य चळवळीचे आधारवड ठरलेल्या आणि रयत शिक्षण संस्थेची स्थापना करणारे कर्मवीर भाऊराव पाटील ऊर्फ “अण्णा’ हे केवळ एक नाव नव्हतं, ते एक युग होतं. शिक्षणक्षेत्रातील एक क्रांतिपर्व होतं. जवळ कुठलीही डिग्री (पदवी) नाही, पैसा नाही, अशाही अवस्थेत शून्यातून ब्रह्मांड निर्माण करून त्यांनी बहुजन समाजावर ज्ञानामृताची वृष्टी केली. स्वावलंबनातून शिक्षण, विद्येला श्रमाची जोड हा स्फूर्तिदायक संदेश त्यांनी दिला. उच्चवर्णीयांच्या शिक्षण मक्तेदारीच्या काळात पिढ्यान्पिढ्या अज्ञानरूपी अंध:कारात खितपत पडलेल्या बहुजन समाजाला नवी दिशा देणाऱ्या, जातीभेद तोडून टाकण्याची शिकस्त करणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील वारणेच्या काठी वसलेल्या “कुंभोज’ या छोट्याशा गावी 22 सप्टेंबर 1887 रोजी झाला. वडिलांचे नाव पायगोंडा पाटील व आईचे नाव गंगाबाई, तर धर्मपत्नीचे नाव लक्ष्मीबाई होते. कर्मवीरांचे प्राथमिक शिक्षण दहिवडी, विटा पुढील शिक्षण कोल्हापुरातील राजाराम हायस्कूलमध्ये झाले. कोल्हापूरच्या बोर्डिंगहाउसमध्ये असताना त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला. त्यातून त्यांची वैचारिक जडणघडण झाली. अन्यायाची प्रचंड चिड, खरे तेच बोलणार, सत्य तेच सांगणार हे तत्त्व त्यांच्यात भिनलेले. लहानपणापासूनच बंडखोरवृत्ती !
विद्यार्थीदशेत ते महात्मा फुले, महर्षी वि. रा. शिंदे, राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याने प्रभावित झाले होते. त्याचदरम्यान त्यांचा सत्यशोधक समाजाच्या विचारसरणीचा पगडा त्यांच्यावर पडून ते सत्यशोधक समाजाचे अनुयायी बनले. ओगले ग्लास वर्क्स, किर्लोस्कर ब्रदर्स या कंपन्यांचे फिरते विक्रेते म्हणून काम करीत असताना त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर भ्रमंती केली. त्यामुळे त्यांना ग्रामीण भागातील जनतेच्या प्रचंड दारिद्य्राची, अज्ञानाची, अंधश्रद्धेची जाणीव झाली. बहुजन समाजातील या बहुतेक समस्यांवर “शिक्षण’ हाच एकमेव उपाय आहे हे त्यांनी हेरून ग्रामीण भागातील गोर-गरीब, दीन-दलितांचे प्रश्न सोडवायचे असतील तर तेथे शिक्षणाचा प्रसार होणे अत्यंत जरुरीचे आहे हे लक्षात आल्यानंतर बहुजन समाजाला ज्ञानी बनवण्यासाठी त्यांनी काही मित्रांच्या सहकार्याने सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात दुधगाव येथे “दुधगाव विद्यार्थी आश्रम’ ही छोटीशी संस्था काढली व कर्मवीरांच्या शैक्षणिक कार्यास प्रारंभ झाला. हे आश्रम म्हणजे रयत शिक्षण संस्थेचे मूळ रोपटे म्हणता येईल. या आश्रमात सर्व जातीच्या विद्यार्थ्यांची राहण्याची व अभ्यासाची सोय होती. त्यानंतर असाच प्रयोग काले ता. कराड व नेर्ले ता. वाळवा येथे केला. याच प्रयोगाचा एक भाग म्हणून “वटवृक्ष’ हे बोधचिन्ह व “स्वावलंबी शिक्षण’ हे ब्रीद घेऊन त्यांनी 4 ऑक्टोबर 1919 रोजी “रयत शिक्षण संस्थे’ची सातारा जिल्ह्यातील काले येथे स्थापना केली. बहुजन समाजाच्या मुला-मुलींना शिक्षण देण्यासाठी काढलेली शिक्षण संस्था म्हणून संस्थेचे नाव “रयत शिक्षण संस्था’ असे सार्थ ठेवण्यात आले. श्रम, स्वावलंबन व समता या तीन तत्त्वांवर त्यांच्या शैक्षणिक कार्याचा वटवृक्ष आधारलेला होता. सातारा येथे सध्या रयत शिक्षण संस्थेचे कार्यालय असून आजमितीस 444 पेक्षा जास्त हायस्कूल, 43 महाविद्यालये,91 वसतिगृहे, 6 अध्यापक विद्यालये, 62 प्राथमिक विद्यालये, 47 पूर्व प्राथमिक शाळा इत्यादी असा संस्थेचा शाखात्मक विस्तार आहे. 2019 हे वर्ष रयत शिक्षण संस्थेचे “शताब्दी महोत्सवी वर्ष’ म्हणून साजरे झाले.
25 फेब्रुवारी 1927 रोजी महात्मा गांधीजींनी रयत शिक्षण संस्थेला प्रथम भेट दिली होती, तेव्हा सर्व जातीधर्माची मुले एकत्र राहतात, काम करतात, भोजन करतात, अभ्यास करतात हे पाहून महात्मा गांधींना धन्य वाटले. वसतीगृहात कर्मवीरांच्या देखरेखीखाली सर्व मुले अभ्यास व शारीरिक श्रम करीत असत. स्वतः पायी प्रवास करून गोरगरीब कुटुंबातील होतकरू व हुशार मुले जेथे जेथे दिसतील तेथून कर्मवीर त्यांना खांद्यावर उचलून आणून वसतिगृहात ठेवत असत. पोटच्या पोरांप्रमाणे त्यांना सांभाळत असत. त्यांनी मुलांना केवळ क्रमिक शिक्षणच दिले नाही तर त्यांना वात्सल्याची, मायेची उब दिली, मायेचं घरटं दिलं. चोचीतल्या चाऱ्याबरोबर पंखातलं बळ दिलं. वास्तवाचं भान देऊन डोळस बनवलं. त्यांच्या या कार्यात त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाईंनी मोलाचे योगदान दिले. अनेक विद्यार्थ्यांच्या परदेशी शिक्षणाची सोय पालक या नात्याने कर्मवीरांनीच केली.
कर्मवीरांचे शैक्षणिक तत्त्वज्ञान
कर्मवीरांचे शैक्षणिक तत्त्वज्ञान मानवतावादावर आधारलेले आहे. त्यांचे शैक्षणिक विचार म्हणजे शिक्षण हे साध्य नसून साधन आहे. शिक्षण हा माणसाच्या जीवनाचा पाया आहे. मानवजातीच्या उत्कर्षाचे शिक्षण हे एक साधन आहे. शिक्षणातून नवचैतन्य, नवसंस्कृती, नवसमाज निर्माण झाला पाहिजे. कर्मवीर विद्यार्थ्यांना सांगत की, शिक्षण घ्या, शहाणे व्हा, पालकांचे दारिद्य्र आपल्या शिक्षणाच्या आड येऊ देऊ नका, घाम गाळून शिका, समाजाच्या उपयोगासाठी शिका. शिक्षणसंस्थेतून बाहेर पडणारे विद्यार्थी सुसंस्कृत, चारित्र्यसंपन्न व जबाबदार नागरिक बनले पाहिजे असा त्यांचा अट्टाहास होता. प्रभावी शिक्षण हे बलशाली राष्ट्र निर्माण करू शकते म्हणून शिक्षण हे सुलभतेने गरीब विद्यार्थ्यांना देणे ही फार मोठी राष्ट्रीय गरज आहे. शिक्षक हा खेड्यांचा आदर्श ग्रामसेवक आणि प्रभावी ग्रामनायक असला पाहिजे. विद्यामंदिरे व शिक्षण संस्था ही पोट भरण्याची साधने न होता ती विचारांची व विकासाची उगमस्थाने झाली पाहिजेत.विद्यार्थी हा ज्ञानाची अभिलाषा धरणारा, स्वावलंबी असला पाहिजे.विद्यार्थ्यांने चारित्र्यसंपन्न, सद्गुणी, निर्व्यसनी असावे. विद्यार्थ्यांनी पहाटे झोपू नये. या वेळेत तुम्ही झोपलात तर तुमचे नशीबही कायमचे झोपेल असे ते म्हणत असत.
स्वावलंबी शिक्षण
विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहून शिक्षण घ्यावे. घरची आर्थिक परिस्थिती शिक्षणामध्ये अडसर ठरू नये म्हणून त्यांनी “कमवा व शिका’ ही अभिनव योजना सुरू केली. कर्मवीरांचा आदर्श घेऊन भारतातल्या बहुतांश विद्यापीठांनीसुद्धा ही योजना सुरू केलेली आहे.
गाव तेथे शाळा असावी
कर्मवीरांच्या मते विना शाळेचे एकही गाव महाराष्ट्राच्या नकाशावर दिसता कामा नये. प्रत्येक गावात शाळा, बहुजन समाजातील शिक्षक व शिक्षक प्रशिक्षण या त्रिसूत्रीचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. शालांत शिक्षणानंतर सहज उच्च शिक्षण घेता यावे यासाठी त्यांनी ग्रामीण भागात महाविद्यालयाचे जाळेही निर्माण केले.
स्त्री-शिक्षणाला प्राधान्य
महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी वि. रा. शिंदे, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याप्रमाणे कर्मवीरांनीसुद्धा स्त्री-शिक्षणाला प्राधान्य दिले. मुलींनासुद्धा प्राधान्यक्रमाने शाळा, महाविद्यालयात प्रवेश देऊन स्त्री शिक्षणाला प्राधान्य दिले. 1942 साली त्यांनी मुलींसाठी मिश्र वसतिगृह व प्राथमिक स्त्री शिक्षिकांसाठी “जिजामाता अध्यापिका विद्यालय’ सातारा येथे सुरू केले. त्यांनी आंतरजातीय विवाहासही प्रोत्साहन दिले.
साधी राहणी व उच्च विचारसरणी ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये. कर्मवीरांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव भारत सरकारने 26 जानेवारी 1959 रोजी “पद्मभूषण’ हा किताब देऊन केला. पुणे विद्यापीठानेही त्यांना 1959 मध्ये मानद डी.लिट्. ही पदवी देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला. शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या, स्वातंत्र्य चळवळीसाठी हजारो कार्यकर्ते निर्माण करणाऱ्या, आधुनिक महाराष्ट्राचा भगीरथ, महाराष्ट्राच्या समाजपरिवर्तन चळवळीचा हा ज्ञानदूत, महान कर्मयोगी 9 मे 1959 रोजी अनंतात विलीन झाला. त्यांच्या पावन स्मृतींना त्रिवार वंदन!