वाल्हे, (वार्ताहर) – चारा शिल्लक आहे तर चारा डोपो, चारा छावणी मागणी कशासाठी कराता, असा प्रश्न बळीराजाला दुष्काळी पाहणी करण्यासाठी आलेल्या जिल्हास्तरीय पथकाने विचारताच पशुपालकांनी संताप व्यक्त करीत अधिकार्यांना चांगलेच फैलावर घेतले.
वाल्हे (ता. पुरंदर) परिसरात जिल्हास्तरीय पथकाने दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करीत पशुपालकांशी संवाद साधला. पशुसंवर्धन विभागाचे प्रादेशिक आयुक्त डॉ. संतोष पांचपोर, पशुसंवर्धन वैरण विकासचे उपायुक्त गणेश देशपांडे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार, जिल्हा परिषद जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे यांनी दुष्काळ दौर्याच्या माध्यमातून वाल्हे व परिसरामधील वाड्या-वस्त्यांवर भेट दिली.
यावेळी, पुरंदर पशुधन विकास अधिकारी डॉ. अस्मिता सताळकर, तालुका कृषी अधिकारी सुरज जाधव, सहायक गटविकास अधिकारी जयराम लहमटे, सासवडचे पशुधन विकास अधिकारी डॉ. विष्णू ठोंबरे, वाल्हेचे डॉ. माणिक बनगर, डॉ. परमेश्वर परिहार, कृषी पर्यवेक्षक प्रवीण अडसूळ, कृषी सहायक गीता पवार आदी उपस्थित होते.
जिल्हास्तरीय पथकाने वाल्हे परिसरातील, वागदरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील पवारवाडी, बहिर्जीचीवाडी, गायकवाडवाडी येथे थेट शेतकर्यांच्या गोठ्यामध्ये जाऊन चार्यांची पाहणी केली. तसेच जनावरांच्या गोठ्याची पाहणी करीत, तयार केलेल्या मुरगाघास संबंधित विचारणा करीत वरील प्रश्न उपस्थित करताच शेतकर्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
या वर्षी पावसाअभावी जनावरांच्या चारा-पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. तरीदेखील अद्यापपर्यंत शासनाकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आली असे म्हणत अधिकार्यांवर संताप्त व्यक्त केला.
बळीराजा म्हणाला की…
हा चारा बाहेरील तालुक्यातून, गावातून आणून, पशुधन जगविण्यासाठी धडपडत असल्याचे सांगितले. तसेच, उपलब्ध चारा फक्त 15 ते 20 दिवस पुरेल इतकाच शिल्लक आहे. चारा संपल्यानंतर दावणीचे एखादे जनावर विकून शेजारील तालुक्यातील पशुधनास चारा आणून जगवावे लागणार आहे. यामुळे शासनाने याबाबतची गांभीर्याने दखल घेत चारा छावणी किंवा चारा डोपो त्वरित सुरू करावा; अशी मागणी पशुपालकांनी केली.