पुणे – करोना परिस्थितीत सुधारणा झाली, तर महाविद्यालये सुरू करण्यास कोणतीही हरकत नाही. परंतु तिसरी लाट येताना दिसत असेल, तर महाविद्यालये सुरू करणे धाडसाचे होईल. त्यामुळे टास्क फोर्स कडून प्राप्त होण्याऱ्या सूचनेनुसार महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. त्यामुळे आता वरिष्ठ महाविद्यालये सुरू होण्याची शक्यता पुन्हा धूसर बनली आहे.
पुण्यात रविवारी पत्रकार परिषदेत सामंत यांनी तूर्तास महाविद्यालये सुरू करण्यावरून राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. मुंबईत करोनाची संख्या वाढत असून, त्यात लहान मुलांना समावेश आहे. तसेच केंद्रानेही तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. अशा परिस्थितीत महाविद्यालये करणे घाईचे ठरणार आहे. सध्याची महाविद्यालयातील करोनाची स्थिती व निरीक्षण करून महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी म्हटले.
सीईटीसंदर्भात सामंत म्हणाले, या परीक्षांसाठी राज्यातील पूर्वीची 193 परीक्षा केंद्र 350 पर्यंत वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी काही कालावधी जात आहे. त्यामुळे या पूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंदाजित तारखांमध्ये बदल करावा लागला. येत्या दोन-चार दिवसांत सीईटीच्या तारखा प्रसिद्ध होतील. त्यापुढील प्रक्रिया वेगाने करण्यात येईल.
प्राध्यापक भरतीचा निर्णय अधांतरीच
प्राध्यापक भरतीसंदर्भात उच्च शिक्षण विभागाची भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली. कालच नवप्राध्यापक संघटनेबरोबर प्राध्यापक भरतीसंदर्भात चर्चा झाली. या निर्णयाबाबत येत्या दोन-तीन दिवसांत वित्त विभागाच्या मंत्र्यांची चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यातून प्राध्यापक भरतीचा निर्णय होईल, असेही उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
पीएच. डी.बाबत पत्रकारिता विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटेना
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न संशोधन केंद्रामध्ये केवळ मार्गदर्शक उपलब्ध नसल्यामुळे पत्रकारित्ता विषयात विद्यार्थ्यांना पीएच. डी. करता येत नसल्याचे विद्यापीठ प्रशासनाच्या वारंवार निदर्शनास आणून देण्यात आले. मात्र, अद्याप यावर कोणताही सकारात्मक निर्णय घेतला गेला नाही. याबाबत उदय सामंत यांनाच पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर विद्यापीठाची चर्चा करून त्यावर निर्णय घेतला जाणार असल्याचे म्हटले.