जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील हे मागच्या १३ दिवसापासून उपोषण करत आहेत. दरम्यान, आजपासून जरांगे यांनी उपचार आणि पाणी घेण्यास नकार दिला असून, यापुढे आपण आमरण उपोषण सुरु करणार असल्याचे म्हटले आहे. त्यासोबतच सरकार वेळोवेळी वेळ मागून घेत आहे. त्यामुळे महिना नाही आणखी दोन महिन्या घ्या, पण आरक्षण द्या असे जरांगे म्हणाले आहेत. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्यावरुन आता मनोज जरांगे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळी एका वृत्तवाहिनीशी बोलताना हा इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी, “आता पुढील दिशा म्हणजेच आमरण उपोषण सुरु केले आहे. सरकारला कालपर्यंत दिलेला वेळ आता संपला आहे. याचा अर्थ असा नाही की, सरकारने प्रयत्न केले नाही. त्यांनी प्रयत्न केले, पण त्यांनी काढलेल्या जीआरमध्ये चुका झाल्या. त्यामुळे यात मुख्यंमत्री एकनाथ शिंदे नक्कीच बदल करतील. मात्र, त्यांना मी शब्द दिला होता की, चार दिवस पाणी आणि उपचार घेईन. मी माझ्या शब्दावर पक्का असून, आता चार दिवस झाले आहेत. त्यामुळे आजपासून पाणी आणि उपचार घेण्याचं बंद केले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना त्यांनी,”सरकार एक महिन्याचा वेळ मागत आहे, त्यामुळे वेळ देण्यासाठी आमची काहीही हरकत नाही. आमचं उपोषण सुरुच आहे. तुम्ही एक महिन्याने निर्णय घेऊन या किंवा दोन महिन्यांनी घेऊन या आमची हरकत नाही. पण आरक्षणाचा निर्णय घेऊन या, तोपर्यंत आमचे उपोषण सुरुच राहणार आहे. तसेच पुढील दिशा कशी असणार आहे याबाबत आम्ही आमच्या काही लोकांची आज बैठक घेत असल्याचे जरांगे म्हणाले.
त्यासोबतच अंतरवाली गावात मनोज जरांगे यांनी सुरु केलेल्या उपोषणाच्या सुरवातीपासून शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर जरांगे यांच्या संपर्कात आहे. तसेच अनेकदा त्यांनी उपोषणाच्या ठिकाणी भेट देऊन सरकारच्या वतीने भूमिका मांडली. दरम्यान, शनिवारी देखील अर्जुन खोतकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पत्र घेऊन अंतरवाली सराटी गावात पोहोचले होते. तसेच उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र, जोपर्यंत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचं जरांगे म्हणाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा खोतकर यांना ‘रिकाम्या हाती’ परतावे लागले.