मुंबई : राज्यात लॉकडाऊनच्या काळात दि. २२ मार्च ते १ मे या कालावधीत कलम १८८ नुसार ८९,३८३ गुन्हे दाखल झाले असून १७,८१३ व्यक्तींना अटक करण्यात आली. तर या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या १७१ घटनांची नोंद झाली असून यात ६५७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. अशी माहिती पोलीस विभागाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पोलीस अधिकारी कर्मचारी देखील २४ तास कार्यरत आहेत. या संकटाशी मुकाबला करताना दुर्दैवाने ५१ पोलीस अधिकारी व २९१ पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
त्यापैकी २३ पोलीस अधिकारी व २६ कर्मचारी कोरोनामुक्त झाले असून उरलेल्या २८ पोलीस अधिकारी व २६२ पोलीस कर्मचारी यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुर्दैवाने ३ पोलीस कर्मचाऱ्यांचे निधन झाले.