नांदेड: महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्या वळणावर जाताना दिसत आहे. आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी चांगलीच राजकीय फिरकी घेतली. “एखादा सिनेमा चालला तर चांगलाच चालतो, अन्यथा एकदम खाली पडतो. सुदैवानं काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे आमचा सर्वांचा राजकीय सिनेमा सध्या चांगला चालतोय”, असे विधान अशोक चव्हाण यांनी केले.
तसेच संविधानाच्या चौकटीत राहून हे सरकार चाललं पाहिजे. हे शिवसेनेकडून लिहून घ्या. संविधानाच्या उद्देशिकेपलिकडे जाता येणार नाही आणि असं झालं तर सरकारमधून बाहेर पडायचं, असं सोनिया गांधींनी सत्ता स्थापनेच्या वेळी सांगितलं, असे वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केले आहे.
चव्हाण म्हणाले, तीन पक्षांचं सरकार म्हणजे तीन विचारांचं सरकार, हे सरकार चालणार कसं? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. दिल्लीमध्ये आमच्या ज्येष्ठ नेत्यांना भेटलो. त्यांनी परवानगी देण्यास नकार दिला. रोज भांडणं होतील. रोज प्रश्न निर्माण होतील. सरकार चालणार कसं? आम्ही सांगितलं, चिंता करु नका. मी स्वत: मुख्यमंत्री म्हणून दोन पक्षांचं सरकार चालवलं आहे. त्यात अजून एका पक्षाची भर होईल. त्यात चिंता करायचं कारण नाही.