नवी दिल्ली -केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी सध्या केरळमधील वायनाडच्या दौऱ्यावर आहेत. कॉंग्रेस नेते राहुल गांधी लोकसभेत वायनाड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असल्याने स्मृती यांच्या दौऱ्याचे महत्व आणखीच वाढले आहे.
राहुल सध्या नेपाळ दौऱ्यावर आहेत. तेथील नाईट क्लबमध्ये राहुल उपस्थित असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्याच्या दिवशीच स्मृती यांच्या वायनाड दौऱ्याची माहिती पुढे आली. त्यामुळे वायनाडसाठी भाजपने कुठली खास राजकीय योजना बनवली आहे का, याविषयी तर्क-वितर्क सुरू झाले.
केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा हा खरे तर स्मृती यांच्या दौऱ्याचा उद्देश आहे. मात्र, त्या आढाव्यासाठी केंद्र सरकारने स्मृती यांची निवड केल्याने संबंधित घडामोड अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली आहे. देशात 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत स्मृती जायंट किलर ठरल्या.
त्यांनी कॉंग्रेस आणि गांधी परिवाराचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या उत्तरप्रदेशच्या अमेठीत थेट राहुल यांना पराभूत केले. त्या निवडणुकीला राहुल अमेठी आणि वायनाड अशा दोन मतदारसंघांतून सामोरे गेले. अमेठी गमावली तरी वायनाडमध्ये ते विजयी झाले. आता स्मृती यांनी वायनाडलाही धडक दिल्याने त्यांच्या दौऱ्याची चर्चा काही दिवस राजकीय वर्तुळात होत राहील.