एकेकाळी जागतिक क्रिकेटला फिक्सिंगचे ग्रहण लागले होते. आता गेल्या काही वर्षांपासून डोपिंगचा काळिमा लागत आहे. याबाबत अत्यंत कठोर नियमावलीही तयार आहे. मात्र, त्याला खेळाडू भीक घालत नाहीत.
जागतिक उत्तेजक द्रव्य सेवन विरोधी समिती (वाडा) तसेच राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य सेवन विरोधी समिती (नाडा) यांच्याकडून सातत्याने खेळाडूंची जनजागृती केली जाते, त्यांना बंदी घातलेल्या औषधांबाबत माहितीही दिली जाते तरीही या घटना घडतात. पृथ्वी शॉ याच्याबाबतचे प्रकरण ताजे असताना आता मध्य प्रदेशची नवोदित क्रिकेटपटू अंशुला राव हिच्यावर या प्रकरणात चार वर्षांची बंदी लावली गेली आहे.
नाडाने मध्य प्रदेशकडून खेळणारी अष्टपैलू महिला क्रिकेटपटू अंशुला राव हिच्यावर ही कारवाई करताना अनेक खेळाडूंनी यापासून बोध घ्यावा ही अपेक्षा व्यक्त केली असली, तरीही सातत्याने विविध खेळाडू डोपिंगमध्ये सापडताना दिसत आहेत. या मागचे कारण शोधले तर असे लक्षात येते की एकतर त्यांना त्यांचे प्रशिक्षक बंदी घालण्यात आलेल्या औषधांची पुरेपूर माहिती देत नाहीत किंवा खेळाडूच आपली क्षमता सरस कामगिरीसाठी कमी पडते हे लक्षात आल्यावर ही क्षमतावाढीची औषधे जाणून बुजून घेतात.
अंशुला राव डोपिंगमुळे बंदी घालण्यात आलेली भारताची पहिलीच महिला क्रिकेटपटू ठरली आहे. 23 वर्षांखालील मध्य प्रदेशच्या संघाकडून ती खेळते. एकदा एका चुकीमुळे शिक्षा झाली तर खेळाडूमध्ये सुधारणा होते, पण अंशुलाच्या बाबतीत हे विधानही खोटे ठरले आहे. ती गेल्या वर्षीही याच कारणाने दोषी ठरली होती.
बंदी घातलेले किंवा प्रतिबंधित पदार्थाचे सेवन का केले, याचेही तिच्याकडे कोणतेही उत्तर नाही यावरूनच एकतर ती नशेबाज झाली असावी किंवा क्षमतेपेक्षाही जास्त सरस कामगिरी व्हावी यासाठी ती हे उद्योग करत असावी. नाडाचा बीसीसीआयशी करार झाला असून त्याअंतर्गत कोणत्याही स्पर्धेत कोणत्याही खेळाडूची चाचणी घेण्याचे अधिकार नाडाला आहेत. त्यानुसारच त्यांनी अंशुलाची चाचणी केली व तिचे अ आणि ब नमुने बेल्जियममधील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते.
अंशुलाने प्रतिबंधित औषध जाणीवपूर्वक घेतल्याचे मत नाडाने ठामपणे व्यक्त केले असल्याने यात कोणतीही शंका घेण्याचे कारणच उरलेले नाही. मुळात प्रश्न हा आहे की, खेळाडू हे प्रकार का करतात? त्यांचे प्रशिक्षक किंवा ते ज्या संघाकडून खेळतात त्याचा सपोर्ट स्टाफ त्यांना याबाबत माहिती का देत नाही? पृथ्वी शॉ याच्याबाबतही हेच घडले होते. मात्र, त्यावेळी त्याला माणुसकीच्या भावनेतून वाचवले गेले.
त्याच्यावर आठ महिन्यांची लावलेली बंदी ही काही महिन्यांपूर्वीची दाखवली गेली व त्याला पुन्हा एकदा मैदानात उतरवण्यासाठी रान मोकळे केले गेले. अशीच माणुसकी अंशुलाच्या बाबतीतही गेल्या वर्षी दाखवली गेली होती. मात्र, तिने तिची कारकीर्द आणि माणुसकीच आता पायदळी तुडवल्याचे स्पष्ट होत असताना तिला पुन्हा खेळण्याची संधी देऊ नये.
केवळ चार वर्षांची बंदीच नाही तर क्रीडा विश्वातून ही कीड साफ करायची असेल तर तहहयात बंदी लावली गेली पाहिजे. तसेच त्या खेळाडूचे जणू कोर्ट मार्शल केले गेल्याप्रमाणे त्याने मिळवलेली पदके, पुरस्कार काढून घेतले जावेत. तसेच केलेली कामगिरी देखील रद्द ठरवली जावी तरच खेळाडूंवर जरब बसेल. कारण थोडीफार शिक्षा होते, हे समजल्यावर निर्लज्जपणा वाढीस लागतो. म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावता कामा नये.
– अमित डोंगरे